(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या शेतकरी ओळखपत्र (फार्मर आईडी) काढण्यात खेड तालुक्याने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील एकूण ४ लाख ८७ हजार ९३६ शेतकऱ्यांपैकी फक्त १ लाख ७९ हजार ५८१ शेतकऱ्यांनी आपले ओळखपत्र तयार केले असून, खेड तालुक्यातील तब्बल ६० टक्के शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. याउलट, रत्नागिरी तालुक्यात केवळ २० टक्के शेतकऱ्यांनीच ओळखपत्र घेतल्याचे दिसून येते.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फार्मर आईडी हे शेतकऱ्यांसाठी आता केवळ ओळखपत्र न राहता, शासनाच्या मदतीचा प्रवेशद्वार बनले आहे. प्रधानमंत्री कृषी योजना, एकात्मिक फलोत्पादन, फळबाग लागवड योजना, खरीप व फळपिकविमा अशा अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीमधील नुकसान भरपाई मिळवण्यासाठी हे ओळखपत्र अनिवार्य आहे.
शेतकरी ओळखपत्र जवळच्या आधारसेवा केंद्रात तयार करून मिळते. शिवाय, २४ एप्रिलपासून शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईलवरूनही हे ओळखपत्र काढण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. महसूल विभागाने २०२१-२२ मध्ये केलेल्या गणनेनुसार जिल्ह्यातील ४.८७ लाख शेतकऱ्यांची नोंद आहे. मात्र, आजतागायत फक्त ३६ टक्के शेतकऱ्यांनीच आपले ओळखपत्र घेतल्याचे चित्र आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करून घ्यावा, यासाठी कृषी विभागाकडून प्रबोधन आणि जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.