(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील सागरी महामार्गावर गोळप शिरंबाळवाडी येथे रस्ता ओलांडणाऱ्या पादचार्याला भरधाव वेगाने आलेल्या ओम्नी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला असून ओम्नी वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पूर्णगड सागरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात २ मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडला होता. मात्र, १२ मे रोजी रात्री ११.१८ वाजता संबंधित वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक प्रशांत लोहळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ओम्नी चालक अरविंद शिवराम गुरव (वय ५०, रा. सापुचेतळे वाडी, लिंबू) हे आपल्या ताब्यातील ओम्नी वाहनाने रत्नागिरीहून पावसकडे जात असताना, शिरंबाळ फाटा येथे पादचारी संदीप सुरेश तोस्कर (वय ३६) यांना जोरात धडक दिली.
या अपघातात संदीप तोस्कर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संशयित चालक अरविंद गुरव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पूर्णगड सागरी पोलीस करत आहेत.