(मुंबई)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याच्या शिक्षण क्षेत्रात रोज वेगवेगळे बदल होताना दिसत आहेत. आता नवीन वर्ग संरचनेचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार चौथीच्या वर्गाला पाचवीचे वर्ग आणि सातवीच्या वर्गाला आठवीचे वर्ग जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही नवी संरचना पहिली ते पाचवी प्राथमिक सहावी ते आठवी उच्च प्राथमिक व नववी ते दहावी माध्यमिक अशी आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण घरापासून एक किलोमीटरच्या आत असलेल्या शाळेत मिळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने पाचवीचे वर्ग माध्यमिक शाळांमधून हटवून प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय शालेय विभागाने घेतला आहे. या निर्णयानुसार, ज्या माध्यमिक शाळांमध्ये सध्या पाचवीचे वर्ग चालू आहेत, तिथून विद्यार्थ्यांचे समायोजन त्यांच्या इच्छेनुसार घराजवळील अनुदानित, स्थानिक किंवा नागरी संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये केले जाईल. विशेष म्हणजे, ज्या संस्थांकडे १ली ते ४थीपर्यंतचे वर्ग असणाऱ्या प्राथमिक शाळा आहेत, त्या शाळांमध्येच पाचवीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मिळून सुमारे १९.२८ लाख विद्यार्थी आठवीत शिकत आहेत. तर नववीत केवळ १८.६३ लाख विद्यार्थी शिकत आहेत. म्हणजे सुमारे ४० हजार विद्यार्थी खासगी व्यवस्थापनाच्या शाळेत प्रवेश घेतात. मात्र ४० हजार विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळा नसल्याने विद्यार्थ्यांकडे खासगी शाळेत प्रवेश घेण्याशिवाय वा शिक्षण सोडण्यावाचून पर्याय नसतो. वर्ग जोडल्याने ही गळती रोखता येईल, असे सांगण्यात आले आहे.