(दापोली)
शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेली वनविभागाची ८.३० हेक्टर क्षेत्रफळाची राखीव वनजमीन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नैसर्गिक संपदेने नटलेली ही जागा – ज्यामध्ये सागवान, खैर, शिवण, बिवळा, ऐन, किंजल आणि सातवीनसारख्या वृक्ष प्रजातींचे पंचरस जंगल आहे – आता एका नव्या रूपात नागरिकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.
जुने आणि जीर्ण झालेले रोपवाटिकेचे प्रवेशद्वार पूर्णपणे नव्या रूपात उभे करण्यात आले असून, हे रूपांतर वनपाल रामदास खोत यांच्या संकल्पनेतून साकार झाले आहे. चिपळूण येथील सुप्रसिद्ध चित्रकार श्री. घारे यांनी प्रवेशद्वारावर कोकणभूमीच्या सौंदर्याचे प्रतीक ठरणारी महाराष्ट्राची मानचिन्हे हस्तकलेद्वारे उभारी दिली आहे. त्यामुळे प्रवेशद्वाराचा चेहरामोहरा बदलून गेला असून, याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या रस्त्याने सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र बनले आहे. रोपवाटिकेचा पत्ता ओळखण्यात येणाऱ्या अडचणीही आता दूर झाल्या आहेत. याच भागात काही असमज नागरिकांकडून कचरा टाकला जात होता. मात्र, वनरक्षक व वनपालांच्या पुढाकाराने तेथील परिसर स्वच्छ करण्यात आला असून, सीएसआर निधीतून सूचना फलक लावण्यात आले आहेत. परिणामी, नागरिकांनी कचरा टाकणे बंद केले आहे, आणि स्वच्छ दापोली मोहिमेला नवसंजीवनी मिळाली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात साग, खैर, बाबू, जांभूळ, आवळा आणि पेरूच्या एक लाख रोपांची नागरिकांसाठी वाटप योजना आखण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करावी, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.