(लांजा / प्रतिनिधी)
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लांजा शहरात अर्धवट अवस्थेत ठप्प झालेले दिसत असून, अवकाळी पावसाच्या आगमनाने या कामाचा बोजवारा कसा उडाला आहे, हे आता स्पष्टपणे समोर आले आहे. अवकाळी पावसातच जर रस्त्यांची ही दुर्दशा असेल, तर खरी पावसाळी परिस्थिती कशी असेल, याची झलक आतापासूनच दिसून येत आहे.
महामार्गाच्या दुतर्फा सुरू असलेल्या गटार आणि सर्व्हिस रोडच्या अपूर्ण कामामुळे लांजा शहरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलातून पादचाऱ्यांना, दुचाकीस्वारांना अक्षरशः तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. कोठे रस्त्यावर खोल खड्डे, तर कोठे पाणी साचलेली वाहतुकीची साधने; संपूर्ण शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः लांजा-साटवली फाटा ते कोर्ले तिठा दरम्यानचा महामार्ग भाग तर अत्यंत दयनीय स्थितीत आहे. कोर्ले फाट्यावर तर महामार्गावरच पाणी साचून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. गुरुवार आणि शुक्रवारच्या अवकाळी पावसाने ही अवस्था असताना खरी पावसाळी हंगाम सुरू झाल्यास काय भीषण परिस्थिती निर्माण होईल, याची कल्पना न केलेली बरी. वाहनांची वाढती वर्दळ आणि अपूर्ण कामांमुळे लांजा शहरात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून, लांजा-साटवली फाटा ते बसस्थानकापर्यंतचा प्रवास एक कठीण परीक्षाच ठरत आहे. महामार्गाच्या या अवस्थेमुळे नागरीकांमध्ये तीव्र नाराजी असून, हा महामार्ग की गावातील एखादा दुर्गम रस्ता, असा प्रश्न स्थानिकांना सतावत आहे.
महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचा हलगर्जीपणा आणि प्रशासनाचा उदासीनपणा यामुळे लांजावासीयांची रोजची जीवनशैलीच विस्कळीत झाली आहे. एवढी भयावह परिस्थिती असतानाही या भागाकडे दुर्लक्ष का होते आहे? लांजावासीयांचा वाली कोण, हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने पुढे येत आहे.