( रत्नागिरी / प्रतिनिधी )
जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील उपळे बौद्धजन मंडळ मुंबई ग्रामीण यांच्या विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सव दिनांक १३ मे २०२५ रोजी मोठ्या उत्साहात व सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला. महिलांच्या सशक्तीकरणाच्या उद्देशाने भरवण्यात आलेला हा कार्यक्रम ‘रमाई कट्टा मेळावा’ या विशेष संकल्पनेतून संपन्न झाला. गावातील सर्व महिला बचत गटांच्या सदस्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. रमाई, सावित्रीबाई फुले, जिजाऊ व प्रबोधनकार ठाकरे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास महिलांपर्यंत पोहोचविण्याचा हेतू लक्षात घेऊन त्यांच्या जीवनचरित्राची पुस्तिका महिलांना वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन लांजा तालुका बौद्धजन मंडळ महिला अध्यक्षा सौ. वंदना कदम यांनी केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला वेगळेच स्वरूप लाभले. या कार्यक्रमाला शिवसेना (ठाकरे गट)चे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष कदम व त्यांचे सहकारी सुद्धा उपस्थित होते. त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत बौद्धजन मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संदीप कदम, राजेश कदम, नरेश कदम, कुलदीप कदम, किशोर कदम, अमोल कदम, प्रभाकर कदम, उमेश कदम, रमेश कदम, वर्षा कदम, वैशाली कदम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी समर्पित भावनेने परिश्रम घेतले.

या महोत्सवाचे आयोजन संघटनात्मक एकतेचे व सामाजिक प्रबोधनाचे उदाहरण ठरले. महिलांनी सामूहिक संवाद, गीत-गायन, आणि सामाजिक चर्चा अशा विविध माध्यमांतून आपले विचार मांडले. महिलांना स्वयंरोजगार, शिक्षण, आरोग्य व हक्क याविषयी माहिती देणारे उपयुक्त साहित्य वितरित करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रशांत कदम यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थित महिलांचे आभार मानले आणि या पुढील काळात अधिक प्रभावी सामाजिक उपक्रम घेण्याचे आश्वासन दिले. रमाई कट्टा मेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश देत महिलांना आत्मभान, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारी यांची जाणीव करून देणारा उपक्रम म्हणून हा मेळावा लक्षात राहणारा ठरला.