(मुंबई)
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी अधिकृत संकेतस्थळ https://mahafyjcadmissions.in अखेर कार्यान्वित करण्यात आले आहे. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी नोंदणी प्रक्रिया या संकेतस्थळावर सुरू झाली असून, विद्यार्थ्यांची नोंदणी १९ मे २०२५ पासून सुरू होणार आहे. शिक्षण विभागाने पालक आणि विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावरूनच प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व जिल्ह्यांतील अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन माध्यमातून राबविण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी फक्त ऑनलाइन अर्जच भरावा लागणार आहे. मुळात हे संकेतस्थळ ८ मेपासून सुरू होण्याची योजना होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ते वेळेत सुरू होऊ शकले नाही. अखेर आज ९ मेपासून संकेतस्थळ सर्वांसाठी खुले करण्यात आले असून कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणीसाठी ते उपलब्ध आहे.
दरवर्षी इयत्ता दहावीचा निकाल लागण्यापूर्वी अकरावी प्रवेशासाठीचे संकेतस्थळ उघडले जाते. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत दोन टप्पे असतात – पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरली जाते, तर दुसऱ्या टप्प्यात महाविद्यालयांच्या पसंतीक्रमांची निवड केली जाते. मात्र यंदा दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहिती भरण्याची सुविधा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य मंडळांनी १५ मेपूर्वी दहावीचा निकाल घोषित केला जाईल, असे जाहीर केले असून त्यानंतरच १९ मेपासून विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे.
दरम्यान, शिक्षण विभागाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू होण्यापूर्वी काही व्यक्तींनी शासनाच्या अधिकृत लोगोचा व शालेय शिक्षण मंत्र्यांच्या छायाचित्रांचा गैरवापर करून बनावट संकेतस्थळ तयार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्या संकेतस्थळावर काही खासगी महाविद्यालयांच्या जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या प्रकाराबाबत शिक्षण विभागाने तत्काळ कारवाई करणे अपेक्षित असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे.