(ठाणे)
ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करणाऱ्या अमरजितसिंह यादव या फेरीवाल्यास ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्षांच्या सक्तमजुरीसह अन्य कलमांखाली एकत्रित शिक्षा सुनावली आहे. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांच्या युक्तिवादावर निर्णय देताना न्यायाधीश आशुतोष भागवत यांनी आरोपीला दोषी ठरवले. हा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.
ही घटना ३० ऑगस्ट २०२१ रोजी माजिवडा-मानपाडा प्रभागातील कासारवडवली मार्केट परिसरात घडली होती. सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे बेकायदेशीर फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या असताना, आरोपी अमरजितसिंह यादव याने संतप्त होऊन त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. हल्ला चुकवण्यासाठी पिंपळे यांनी डोक्याचा बचाव करताना हात वर घेतला, मात्र त्यात त्यांच्या हाताची तीन बोटे छाटली गेली. त्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट कापले गेले. घटनेनंतर आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न करत चाकू गळ्यावर ठेवून पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेल्या युक्तिवादात एकूण २१ साक्षीदार तपासण्यात आले. घटनास्थळी उपस्थित शासकीय अधिकारी, अंगरक्षक, वैद्यकीय अहवाल आणि इतर दस्तऐवजी पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने यादव याला दोषी ठरवले. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत ७ वर्षांची सक्तमजुरी, कलम ३५३ (सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा) अंतर्गत ३ वर्षे, कलम ३३२ (सरकारी कर्मचाऱ्यास जखमी करणे) अंतर्गत २ वर्षे आणि मुंबई पोलीस कायदा कलम ३७(१)(३) अंतर्गत २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. ही सर्व शिक्षा आरोपीने एकत्रितपणे भोगावयाची आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सांगितले की, आरोपीचा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून, एक कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यावर अशा प्रकारे हल्ला होणे प्रशासनावर थेट आघात करणारे आहे. त्यामुळे आरोपीस कठोर शिक्षा मिळणे गरजेचे होते. या निकालामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत न्यायालयाने कडक भूमिका घेतली असून, अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तो एक ठोस इशारा ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.