(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा परिषदेत सध्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये बदल्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. विविध विभागांतर्गत पदोन्नती प्रक्रियेने गती घेतल्याने लवकरच बदल्यांचे सत्र सुरु होणार असल्याचे संकेत जिल्हा परिषद प्रशासनाकडून मिळत आहेत. पदोन्नती प्रक्रियेनंतर बदली पात्र अधिकाऱ्यांनी स्वतःच्या सोयीच्या जागी नेमणूक मिळवण्यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मे महिना आला की बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये कार्यकाल पूर्ण केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य ठिकाणी बदली मिळावी यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सातारा जिल्हा परिषदेसह राज्यभरात या प्रक्रियेला वेग मिळत असून, प्रशासकीय, विनंती आणि आपसी बदल्यांच्या प्रस्तावांची माहिती घेणे सुरू झाले आहे.
प्रशासनाकडून बदल्यांची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून नियमितपणे आढावा घेतला जात असून, कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.
दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषद प्रशासकीय राजवटीखाली कार्यरत आहे. पदाधिकारी व सदस्य नसल्यामुळे काहींच्या बेजबाबदार वागणुकीमुळे अनुशासन बिघडल्याचे चित्र दिसून येत आहे. काही कर्मचारी बेफिकिरीने वावरत असून, त्यांच्या कारभाराकडे कोणाचेही लक्ष नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
बदल्यांची प्रक्रिया ही केवळ….
रत्नागिरी जिल्हा परिषदेची एक वेगळी कार्यसंस्कृती आणि देशपातळीवर ओळख आहे. या लौकिकाला बाधा येऊ नये, यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. बदल्यांची प्रक्रिया ही केवळ प्रशासकीय औपचारिकता न राहता, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा योग्य उपयोग होईल अशा पद्धतीने पार पडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.