(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या १५ पोलिस अधिकारी व अंमलदारांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले असून, रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस फौजदार राजेंद्र सावंत यांची या गौरवात निवड झाली आहे. पोलिस दलात त्यांच्या उल्लेखनीय व परिणामकारक कामगिरीची दखल घेत त्यांना हे सन्मानचिन्ह १ मे रोजी (महाराष्ट्र दिनी) प्रदान करण्यात येणार आहे.
फौजदार राजेंद्र सावंत सध्या रत्नागिरी शहराजवळील कोकणनगर पोलिस चौकी येथे कार्यरत आहेत. कोकणनगर परिसरात रुजू झाल्यानंतर त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या समस्या आणि तक्रारी याकडे संवेदनशीलतेने आणि न्यायालयीन प्रक्रियेची चौकट लक्षात घेऊन कार्यवाही केली आहे. त्यांच्या कामामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अधिक मजबूत झाली असून, नागरिकांमध्ये पोलिस दलाविषयी विश्वास निर्माण झाला आहे.
फौजदार सावंत यांनी गंभीर गुन्ह्यांच्या तपासात विशेष कौशल्य दाखवले आहे. त्यांनी तपास केलेल्या अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली असून, काही गुन्ह्यांमध्ये फरार आरोपींना शोधून काढण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. यामध्ये घरफोडी, चोरी, मारामारी, फसवणूक, तसेच महिला अत्याचारसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. गुन्हे उघडकीस आणण्यासोबतच त्यांनी पुराव्यांचे सखोल विश्लेषण करून न्यायालयीन यंत्रणेसमोर दोषारोप सिद्ध करण्यात यश मिळवले आहे. स्थानिक गणेशोत्सव, नवरात्र, रमजान आणि इतर सार्वजनिक सण-उत्सव काळात शांतता सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सावंत यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर होताच त्यांच्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल चोहोबाजूंनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.