(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार रत्नागिरीसह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये आज (गुरुवार) सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे तापलेल्या वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला. मात्र याच दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्याने काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली.
बुधवारी पहाटेच्या सुमारास मालगुंड–गणपतीपुळे परिसरातही तुरळक पावसाच्या सरी पडल्या. गणपतीपुळे भागात जोरदार वाऱ्यासह काही झाडे कोसळल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. गुरुवारी सकाळी साधारण साडेनऊच्या सुमारास रत्नागिरी शहरात अचानक आभाळ दाटून आले आणि अवकाळी पावसाची सुरुवात झाली. पावसाचा जोर फारसा नसलाही, तरी पंधरा मिनिटांच्या या सरींनी वातावरणात गारवा पसरला. उन्हाच्या चटक्याने त्रस्त नागरिकांना काहीसे समाधान लाभले.
दरम्यान, गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. सुमारे दीड तासांनंतर, सकाळी ४ वाजून ३७ मिनिटांनी विजेचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला.
हवामान विभागाने वादळ आणि अवकाळी पावसाचा इशारा यापूर्वीच दिला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून आकाशात ढगांची गर्दी दिसत होती. आता प्रत्यक्षात पावसाच्या सरी पडू लागल्याने नागरिक आणि शेतकरी दोघेही सतर्क झाले आहेत.