(नवी दिल्ली)
भारतीय सशस्त्र दलांनी आज (बुधवार) पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) नऊ दहशतवादी अड्ड्यांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला असलेल्या बहावलपूरचा समावेश आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा बळी गेल्यानंतर हा निर्णायक लष्करी प्रतिसाद देण्यात आला आहे.
संरक्षण मंत्रालयाने ‘ऑपरेशन सिंदूर’चा भाग म्हणून या हल्ल्यांची पुष्टी केली आहे आणि त्यांना “केंद्रित, मोजमाप आणि अनावश्यक तणाव वाढवणारे नसलेले” असे वर्णन केले आहे. या कारवाईत भारतावर हल्ले करण्याच्या नियोजनात सहभागी असलेल्या दहशतवादी पायाभूत सुविधा लक्ष्य करण्यात आल्या. आज पहाटे विशेष दारुगोळ्याचा वापर करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले.
ही कारवाई काळजीपूर्वक नियोजित होती. केंद्रित, अनावश्यक तणाव वाढवणारी नाही आणि पाकिस्तानी लष्करी तळ टाळण्यासाठी डिझाइन केलेली होती. भारताने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की त्यांनी लक्ष्यांची निवड आणि अंमलबजावणीच्या पद्धतीमध्ये संयम बाळगला आहे. भारतावर हल्ले करण्यात सहभागी असल्याचे मानल्या जाणाऱ्या एकूण नऊ ठिकाणांवर हल्ले झाले. स्कॅल्प क्रूझ क्षेपणास्त्र आणि भारतीय हवाई दलाच्या राफेल लढाऊ विमानांनी सुसज्ज हॅमर क्षेपणास्त्र या दोन शक्तिशाली शस्त्रप्रणाली ऑपरेशन सिंदूरसारख्या मोहिमांमध्ये वापरल्या गेल्या.
या कारवाईत भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेना यांनी संयुक्तपणे केलेल्या समन्वित, बहु-डोमेन हल्ल्याचा समावेश होत. जमिनीवरून आणि समुद्रातून. सर्व दले सक्रियपणे सहभागी होती आणि लक्षणीय म्हणजे, हल्ल्यादरम्यान कोणतेही भारतीय विमान नष्ट झाले नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
सूत्रांच्या मते, ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेअंतर्गत बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले. नऊ ठिकाणे ओळखली गेली आणि त्यांना लक्ष्य करण्यात आले. दहशतवादी छावण्यांवरील सर्व हल्ले यशस्वी झाले. ती नऊ ठिकाणे अशी होती:
- बहावलपूर: पाकिस्तानच्या आत १०० किमी
- मुरीदके: पाकिस्तानच्या आत ३० किमी
- गुलपूर: पाकिस्तानच्या आत ३५ किमी
- सवाई कॅम्प: पाकिस्तानच्या आत ३० किमी
- बिलाल कॅम्प: अंतर नमूद नाही
- कोटली कॅम्प: POK च्या आत १५ किमी
- बरनाला कॅम्प: POK च्या आत १० किमी
- सरजल कॅम्प: POK च्या आत ८ किमी
- मेहमूना कॅम्प: POK च्या आत १५ किमी
दहशतवादी छावण्या असलेल्या ५ शहरांवर हल्ला, ३ मृत्यू, १२ जखमी पाकिस्तानचा पहिला कबूलनामा
भारतीय हवाई हल्ल्यांनंतर आता पाकिस्तानने पहिल्यांदाच कबूल केले आहे की, त्यांच्या ५ शहरांमध्ये (बहावलपूर, कोटली, मुजफ्फराबाद, मीरपूर आणि रावळपिंडी) हल्ला झाला असून त्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही माहिती स्थानिक मीडियामार्फत समोर आली आहे आणि यामुळे भारताच्या ऑपरेशनच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
भारतीय सैन्य दलानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले आहेत. भारतीय सैन्यदलानं एक्सवर पोस्ट करत म्हटले की ‘जस्टिस इज सर्वड.’ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्व सरमा, राजद नेते आणि बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यासह विविध नेत्यांनी ऑपरेशन सिंदूरचं स्वागत करत भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, भारताने कोणत्याही पाकिस्तानी नागरी, आर्थिक ठिकाणांना लक्ष्य केलं नाही. वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावासाने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जारी केलेल्या पत्रकामध्ये, “भारताची कारवाई केंद्रित आणि अचूक होती. ती जबाबदारीने करण्यात आली असून ती आक्रमक स्वरूपाची नव्हती,” असं भारताने स्पष्ट केलं आहे. तसेच, “भारताने कोणत्याही पाकिस्तानी नागरी, आर्थिक किंवा लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलेले नाही. फक्त ज्ञात दहशतवादी तळांवरच हल्ले करण्यात आले आहेत,” असंही भारताने सांगितलं आहे. त्याचप्रमाणे, “हल्ल्यानंतर तातडीने, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी संपर्क साधून भारताने केलेल्या कारवाईबाबत माहिती दिली आहे,” असंही भारतीय दूतावासाने म्हटलं आहे.
भारतीय विमान वाहतूक कंपन्यांनी भारत प्रशासित काश्मीरला जाणारी विमानं रद्द केली आहेत. तसेच राजस्थान आणि पंजाबसारख्या सीमेवर असणाऱ्या राज्यांमध्ये जाणारी विमानं देखील वळवण्यात किंवा रद्द करण्यात आली आहे. एअर इंडियाने म्हटलं आहे की, त्यांनी जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंडीगढ आणि राजकोटला जाणारी सर्व विमानं रद्द केली आहेत. आज दुपारी 12 पर्यंतची विमानं रद्द केल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे.