(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या (सिव्हील) आवारातील पोलीस चौकी सध्या ‘अदृश्य’ अवस्थेत असून, तिची अवस्था एखाद्या अडगळीत तात्पुरत्या निवासगृहासारखी झाली आहे. ना नावाचा फलक, ना पिण्याच्या पाण्याची सुविधा, ना फोनची सोय अशा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ही पोलीस चौकी कार्यरत आहे. याकडे प्रभारी शहर पोलीस निरीक्षकांचे दुर्लक्ष झाले असून, याचा फटका थेट नागरिक आणि रुग्णांना सहन करावा लागत आहे.
पूर्वी सिव्हील रुग्णालयाच्या मुख्य इमारतीजवळ असलेली पोलीस चौकी नूतनीकरणानंतर अद्यापही नव्या स्थळी हलवण्यात आलेली नाही. परिणामी, कोणतीही स्पष्ट दिशादर्शक माहिती उपलब्ध नसल्याने रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना पोलीस चौकी शोधूनही सापडत नाही. अशा अवस्थेत तातडीच्या प्रसंगी मदत मिळण्याऐवजी नागरिक अधिक अडचणीत सापडतात. ही पोलीस चौकी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. मंडणगडपासून राजापूरपर्यंतच्या परिसरातून आलेल्या रुग्णांची नोंद, मृत्यूची नोंद, अपघाती किंवा हिंसाचाराच्या घटनांतील रुग्ण, तसेच कारागृहातून उपचारासाठी आणलेल्या आरोपी यांचीही नोंद येथे केली जाते. अशा संवेदनशील कामांसाठी ही चौकी अत्यावश्यक असून, ती सर्वसामान्यांच्या सहज नजरेस पडेल अशा ठिकाणी असणे गरजेचे आहे.
परंतु सध्याची स्थिती अशी आहे की, ही पोलीस चौकी शोधूनही सापडणार नाही, इतकी ती दुर्लक्षित जागी ठेवण्यात आली आहे. या दुर्लक्षामुळे कायद्याची अंमलबजावणी आणि जनतेला मिळणारी सुरक्षा यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन पोलीस चौकीसाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा व योग्य ठिकाणी स्थलांतरण करण्याची मागणी केली आहे.