(नवी दिल्ली)
२२ एप्रिलला पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांना चार दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केलं. या घटनेचा जगभरातून निषेध नोंदवला जात आहे. दरम्यान ७ मे रोजी भारतात युद्ध सराव अर्थात मॉक ड्रील केलं जाणार आहे. मॉक ड्रील किंवा युद्धाचा सराव ही पद्धत क्षेपणास्त्र हल्ले, हवाई हल्ले या दरम्यान निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी काय केलं पाहिजे? कुठली काळजी घेतली पाहिजे? सरकारी यंत्रणांनी कसं कार्यरत राहिलं पाहिजे याचा सराव असतो. केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर आहे.
हवाई हल्ल्यांचा सायरन वाजला की शहरांमधले दिवे बंद केले जातात. जेणेकरुन शत्रूच्या मिसाईल्सना त्यांची लक्ष्यं दिसू नयेत. तसंच गोंधळ आणि हलकल्लोळ कसा टाळला पाहिजे? याचाही सराव या प्रक्रियेत केला जातो. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर किंवा थेट युद्ध सुरु झाल्यानंतर नागरिकांनी काय काळजी घ्यायची आहे? सरकारी यंत्रणांनी काय करायचं आहे? याचा सराव म्हणजे मॉक ड्रील. महाराष्ट्रात १६ ठिकाणी पार पडणार मॉक ड्रील केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, सार्वजनिक ठिकाणं, शाळा, रेल्वे स्टेशन्स, बस स्थानकं आणि गर्दीच्या भागांमध्ये ७ मे रोजी मॉक ड्रील पार पडणार आहे. आपत्कालिन परिस्थितीत सर्वसामान्य जनता, सुरक्षा कर्मचारी आणि सुरक्षा दलांची तयारी कशी आहे याची पडताळणी करणे हा यामागील उद्देश आहे.
भारतातल्या एकूण २५९ ठिकाणी ७ मे रोजी युद्ध सराव अर्थात मॉक ड्रील केलं जाईल. १९७१ नंतर पहिल्यांदाच देशभरात अशा प्रकारचं मॉक ड्रील केलं जातं आहे. तर महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, उरण, तारापूर, नागोठणे, मनमानड, सिन्नर, थळवायशेत, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा १६ ठिकाणी मॉक ड्रील पार पडणार आहे.
मॉकड्रीलमध्ये नेमकं काय होणार?
- हवाई हल्ल्याची पूर्वसूचना दिली जाईल.
- हल्ल्यावेळी सुरक्षित ठिकाणी लपून बसण्याचं प्रशिक्षण दिले जाईल.
- रात्रीच्या वेळी शत्रूला महत्त्वाची ठिकाणं समजू नये यासाठी ब्लॅकआऊटचं प्रशिक्षण देणार आहे.
- महत्त्वाचे कारखाने शत्रूला दिसू नयेत म्हणून उपाययोजना करण्यात येतील.
- सामान्य नागरिकांना बचावकार्याचं प्रशिक्षण दिलं जाणार
- घरात पाणी, अन्न, इंधनाचा साठा कसा करावा याचं महत्त्वं पटवून दिलं जाणार
- हवाई हल्ल्यात कोणी जखमी झाले तर प्राथमिक उपचार करुन त्याला तातडीने रुग्णालयात कसे पोहोचवायचे, याचा सराव मॉकड्रीलमध्ये केला जाईल.
सायरन वाजताच काय करावे?
- सायरन वाजताच नागरिकांनी सर्वप्रथम घरातील सर्व लाईट बंद करावे.
- तातडीने सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.
- सायरन वाजताच इमारतीपासून दुर जावे.
- किमान 5 ते 10 मिनिटांच्या आत सुरक्षित स्थळी जावे.
- मोकळ्या जागेपासून दूर राहा.