(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यात तापमानाने चढा घेतल्याने पाण्याच्या टंचाईचे संकट आणखी गंभीर होत आहे. एप्रिलच्या अखेरीसच धरणांतील पाणीसाठा ४० टक्क्यांवर घसरला होता, भूजल पातळीत लक्षणीय घट झाल्याचे निरीक्षणात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आता जलसंकटाचा गांभीर्याने विचार करून पाण्याचा वापर अत्यंत जपून करणे गरजेचे ठरत आहे.
जिल्ह्यातील ४६ लघु पाटबंधारे प्रकल्पांतील पाणीसाठा आठवड्याभरात प्रचंड बाष्पीभवनामुळे तब्बल २.८८ दशलक्ष घनमीटरने घटला आहे. सध्या या धरणांमध्ये ९७.२३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक असून, तो केवळ ४१.१३ टक्के आहे. पुढील दीड महिना याच साठ्यावर निभाव काढावी लागणार असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नातूवाडी, गडनदी आणि अर्जुना या तीन मध्यम प्रकल्पांमध्येही पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे. यामध्ये नातूवाडी ९.९३० दलघमी (३६.४७%), गडनदी ५१.८१२ दलघमी (७८.०५%), अर्जुना ४४.६५८ दलघमी (६१.५५%) साठ्याचे प्रमाण असून उकाड्यामुळे जलसाठे झपाट्याने आटत असून, पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा धोक्याची घंटा वाजू लागली आहे.
टँकरवर २० गावांचा भरोसा
पाण्याची टंचाई इतकी तीव्र झाली आहे की, सध्या जिल्ह्यातील २० गावांतील ४५ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या भागातील २० हजार नागरिक सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. विशेषतः रत्नागिरी शहरानजीकच्या गावांमध्ये ही स्थिती अधिक गंभीर आहे.
पाण्याचा अपव्यय टाळा, हीच काळाची गरज आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचना आणि आवाहन गांभीर्याने घेऊन प्रत्येक नागरिकाने पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे अत्यावश्यक बनले आहे.