(संगमेश्वर)
कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या आंबा घाटातील सुरक्षिततेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आता सक्रिय पावले उचलली आहेत. दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळणे, रस्त्यावर माती येणे यामुळे चर्चेत येणाऱ्या या घाटात, सध्या विविध ठिकाणी जाळी बसवणे, रस्त्याचे डांबरीकरण व धोकादायक वळणांची दुरुस्ती अशी कामे वेगात सुरू आहेत.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिमुसळधार पावसात आंबा घाटात बारा ठिकाणी माती रस्त्यावर आल्याने संपूर्ण घाट मार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला होता. परिणामी कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रातील वाहतूक अणुस्कुरा मार्गे वळवण्यात आली होती. त्या संकटानंतर घाटातील तीन प्रमुख खचलेल्या ठिकाणी एक कोटी रुपयांच्या निधीतून दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे.
या कामांमुळे रस्ता पूर्वीपेक्षा रुंद झाला असून काही प्रमाणात सुरक्षितताही वाढली आहे. मात्र, अजूनही घाटातील काही वळणांवर पावसाळ्यात डोंगरातून माती खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पावसाआधीची तयारी सुरू
गेल्या वर्षी पहिल्याच पावसात गणपती मंदिराजवळ डोंगरातील दगड खाली आल्याने मंदिराचे नुकसान झाले होते. ही घटना लक्षात घेता यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाने काही ठिकाणी मजबूत जाळी बसवण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे दरड कोसळण्याचा धोका कमी होईल, असा विभागाचा विश्वास आहे.
वाहतूक सुरळीत राखण्याचा प्रयत्न
जिथे रस्ता खराब आहे, तेथे डांबरीकरणाचे काम सुरू असून, वाहतूक सुरळीत राहावी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही ठिकाणी खडीचा रस्ता अजूनही वाहनचालकांसाठी धोकादायक असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
निसर्गाचा इशारा दुर्लक्षित नको
दरवर्षी निसर्ग संकटाची जाणीव करून देतो आहे. त्यामुळे घाटातील प्रत्येक वळणावर सतत लक्ष ठेवण्याची व योग्य त्या यंत्रणांना सज्ज ठेवण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली असली, तरी या उपाययोजना वेळेत पूर्ण व्हाव्यात आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून रचना व्हावी, अशी मागणी आता स्थानिकांकडून केली जात आहे.