( संगमेश्वर / मकरंद सुर्वे )
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथील हरेकरवाडी महसूल गावातील नळपाणी योजनेच्या लाभार्थीचे पाणी पाणीपट्टी भरलेली असतानाही कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केल्यामुळे सरपंच सहदेव सुवरे यांचेवर अपात्रतेची कारवाई करावी या मागणीसाठी तुरळ येथील ग्रामस्थानी आज (बुधवार) सकाळी अकरा वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
मौजे तुरळ निर्मल तंटामुक्त गृपग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील हरेकरवाडी या महसूल गावात ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजने लप्रमाणेच अन्य चार स्वतंत्र खाजगी योजना गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. यातील चोबारवाडी येथील योजनेवरील ग्रामस्थानी पाणीपट्टी भरलेली असतानाही सरपंच सहदेव सुवरे यांनी जिल्हापरिषद प्राथमिक शाळेचाही पाणीपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर ग्रामस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी याना पत्र दिले होते. त्यानंतर तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने हा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र राजकीय सूडबुद्धीने सरपंच सहदेव सुवरे यांनी केलेल्या या मनमानिविरोधात येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ प्रमाणे सरपंच सहदेव सुवरे यांचेवर पदाचा गैरवापर केल्याने अपात्रतेची कारवाई व्हावी यासाठी मुखयकार्यकारी अधिकारी यांना पत्र दिले होते. त्यानुसार कार्यवाही न झालेने आज (बुधवार) या ग्रामस्थानी ठिय्या आंदोलन छेडले. यावेळी नंदकुमार फडकले, विजय बामणे, संदीप येलोंडे ,मंजिरी फडकले, शमिका बामणे यांच्यासह ग्रामस्थानी या आंदोलनात सहभाग घेतला होता.
यावेळी आपली बाजू मांडताना आंदोलनकर्त्यांनी सरपंच सुवरे यांनी पाणीपट्टी भरलेली असतानाही कोणतीही पूर्वसूचना न देता राजकीय सूडबुद्धीने आमचे व शाळेचे पाणी बंद केल्याचे सांगितले. तसेच लाभार्थ्यांना विश्वासात न घेता दूषित पाण्यासह आर्थिकदृष्ट्या न परवडणाऱ्या लादण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन कॅग्या पाणी योजनेबाबत आपण वरिष्ठ स्तरावर तक्रार केल्याने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचे नंदकुमार फडकले यांनी सांगितले.
याबाबत माहिती घेण्यासाठी सरपंच सहदेव सुवरे यांच्याशी संपर्क साधला असता ही योजना चालवणे ग्रामपंचायतीला परवडणारे नसून ६८ कुटुंबापैकी २३ कुटुंबानी पाणीपट्टी भरली असून इतर थकीत असल्याने आपण हे पाणी बंद केल्याचे सांगितले. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानंतर आपण तात्काळ पाणी सुरू केल्याचे सांगितले.
फोटो: तुरळ ग्रामपंचायतीसमोर आंदोलनाला बसलेले आंदोलक.