(पुणे)
फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. यात पुन्हा एकदा राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. तर राज्याचा निकाल ९१.८८ टक्के इतका लागला आहे. दुपारी १ वाजेपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
यंदा बारावीची परीक्षा दरवर्षीपेक्षा १० दिवस लवकर घेण्यात आली. ११ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत ही परीक्षा सुरळीत पार पडली. राज्यभरातून १५ लाख विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यात ८,१०,३४८ मुले आणि ६,९४,६५२ मुलींचा समावेश होता. यावर्षी मुलींचा निकाल ९४.५८ टक्के तर मुलांचा निकाल ८९.५१ टक्के इतका लागला आहे.
राज्यातील एकूण नऊ विभागांपैकी बारावीच्या निकालात यंदाही कोकण विभाग अव्वल ठरलं असून कोकणाने बाजी मारली आहे. निकालाची सरासरी नेहमीप्रमाणे आहे, अशी माहिती बोर्डाने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन दिली. कोकणचा निकाल हा ९६.७४ टक्के सर्वाधिक लागला असून लातूर विभागाचा सर्वात कमी ८९.४६ टक्के निकाल लागला आहे. तर राज्यात यंदा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे.
असा आहे विभागनिहाय निकाल
कोकण -९६.७४
कोल्हापूर – ९३.६४
मुंबई – ९२.९३
संभाजीनगर – ९२.२४
अमरावती – ९१.४३
पुणे -९१.३२
नाशिक -९१.३१
नागपूर – ९०.५२
लातूर – ८९.४६
यंदा राज्यात कोकण विभागाचा ९६.७४ टक्के सर्वाधिक निकाल लागला असून, सर्वात कमी लातूर विभागाचा लागला आहे. तसेच पुनर्परीक्षेचा निकाल ३७.६५ टक्के आणि दिव्यांगाना सवलतीचे गुण देण्यात आले आहेत. तसेच या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ टक्के इतकी आहे.
रत्नागिरी जिल्हा कॉलेज निहाय निकाल :
https://state-board-strapi-upload.blr1.digitaloceanspaces.com/S9_COLP_d2bfbff8bf.pdf