(रत्नागिरी / प्रतिनिधी)
संत परंपरेचा वारसा जपणाऱ्या मंदिरामध्ये नुकतीच घडलेली एका दुर्दैवी व संतपरंपरेला काळिमा फासणारी घटना आता चांगलीच गाजत असून, त्याचा निषेध करण्यासाठी आज संध्याकाळी भजन कलाकारांच्या व सर्व धर्मीय बांधवांच्या वतीने भजन दिंडीच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात येणार आहे.
ही भजन दिंडी आज, ३ मे रोजी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत पतितपावन मंदिर ते स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा, वळसामार्गे झाडगाव नाका या मार्गावरून काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये काळ्या फिती लावून शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त केला जाणार आहे.
निषेधाचे कारण काय?
भारताची संत परंपरा, समाज प्रबोधन करणारे भजन हे देशाच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग मानले जाते. स्वा. सावरकर यांच्या विनंतीने दानशूर कै. भागोजीशेठ किर यांनी सुरू केलेले पतितपावन मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले होते आणि याच ठिकाणी दर महिन्याला एकत्र येऊन भजनाचा कार्यक्रम होत असे. यामध्ये कोणताही जाती-धर्मभेद नव्हता. मात्र अलीकडे या मंदिरात घडलेली एक घटना ही संत परंपरेच्या सन्मानाला लागणारी ठरल्याचे अनेकांचे मत आहे.
एकतेचा संदेश देणारा मोर्चा
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रसादिक भजन मंडळाच्या वतीने आणि अध्यक्ष साईनाथ नागवेकर व सचिव वासुदेव वाघे यांच्या नेतृत्वाखाली या भजन दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व धर्मीय संस्था, भजन मंडळे, महिला मंडळे व नागरिकांना या शांततापूर्ण निषेधात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.