(संगमेश्वर)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली राजवाडी येथील मारुती मंदिराजवळ शनिवारी सकाळच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बिबट्या रात्री महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी महामार्गावर पडलेल्या बिबट्याचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, मृत बिबट्याचा पंचनामा व आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
वन्यजीवांचा रस्ता ओलांडताना जीव गमावण्याचा धोका वाढतोय
सतत वाढत चाललेल्या वाहनांच्या संख्येमुळे आणि महामार्गावरील वेगावर नियंत्रण नसल्यामुळे अशा घटनांचे प्रमाण वाढत असल्याचे वन्यजीव प्रेमींनी सांगितले. महामार्गावरून प्राणी वारंवार जात असतात, मात्र रात्रीच्या वेळी वाहने भरधाव वेगाने चालवल्यामुळे त्यांना धोका निर्माण होतो. अशा अपघातांमुळे जैवविविधतेला मोठा धोका पोहोचत आहे.