(रत्नागिरी / प्रतिनिधी)
“स्पर्धा कुठलीही असो, धाडस आणि आत्मविश्वास असेल तर स्त्रियाही आकाशाला गवसणी घालू शकतात,” हे नेहा सोहनी हिने प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवले आहे. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा या ग्रामीण भागातील २७ वर्षीय नेहा हिने देशपातळीवरील ‘व्हॅली रन २०२५’ या धोकादायक स्पीड बाईक रायडिंग स्पर्धेत ५०० पुरुष स्पर्धकांना मागे टाकत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ही स्पर्धा कॅस्ट्रोल कंपनीच्या वतीने १३ ते १५ एप्रिल दरम्यान महाबळेश्वर येथील आंबे व्हॅली येथे आयोजित करण्यात आली होती. देशभरातून आलेल्या तब्बल ५०० स्पर्धकांमध्ये नेहा एकमेव महिला स्पर्धक होती. तिच्या आत्मविश्वासाच्या आणि धैर्याच्या जोरावर तिने ही अत्यंत खडतर आणि थरारक स्पर्धा यशस्वीरित्या पार केली.
या यशामागे तिचे जिद्दीचे बळ, सातत्याने घेतलेले प्रशिक्षण आणि तिच्या दोघा मित्रांचे – नदीम शाह आणि झहीर शाह यांचे मोठे योगदान आहे. हे दोघे भाऊ गेल्या १४ वर्षांपासून बाईक आणि कार रेसिंग क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनीच नेहाला प्रेरणा दिली, मार्गदर्शन केले आणि तिच्यासाठी स्पर्धेपूर्वी बाईकची सजावट, स्ट्रॅटेजी व अडचणींचा अभ्यास करून दिला.
नेहाने मुंबईत शिक्षण घेतले असून, बीबीएम आणि पत्रकारितेची पदवी घेतली आहे. तिचे बालपण साखरपामध्ये गेले, मात्र मोठे होण्याची तिची आस आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द तिला थांबू देत नव्हती. एकदा बाईक रायडिंग स्पर्धा बघताना तिच्या मनात ही स्पर्धा स्वतः खेळण्याचा विचार आला आणि त्यासाठी तिने स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं.
या धाडसी आणि प्रेरणादायी कामगिरीनंतर नेहाचे कौतुक सर्वत्र होत आहे. तिच्या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा झेंडा देशपातळीवर फडकला आहे. महिला केवळ पारंपरिक भूमिका नव्हे, तर अतीव धाडस आणि कौशल्य मागणाऱ्या क्षेत्रातही यशाचे शिखर गाठू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
आजच्या पिढीला संदेश देताना नेहा सोहनी म्हणतात, “आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना कधीही घाबरू नका. आपली ध्येये साध्य करण्यासाठी आत्मविश्वास आणि मेहनत अत्यंत महत्त्वाची आहे.” नेहा यांचे पुढील उद्दिष्ट हे आहे, “आता माझं स्वप्न आहे की, मी जगातील सर्वांत वेगवान महिला ड्रॅग रेसर बनून, या क्षेत्रात प्रथम पारितोषिक मिळवावं. हे माझं ध्येय पूर्ण करण्यासाठी मी कठोर परिश्रम आणि समर्पणाने तयारी करत आहे.”