(संगमेश्वर / एजाज पटेल)
महावितरण उपविभाग संगमेश्वरचे आजी आणि माजी कर्मचारी यांच्यासाठी आयोजित केलेला पहिलाच “स्मृतिसंगम 2025” हा गेटटुगेदर कार्यक्रम 26 एप्रिल 2025 रोजी हापूस एग्रो टुरिझम, रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व उपस्थित सभासदांच्या उत्स्फूर्त सहभागाने झाली. आयोजन समितीच्या वतीने प्रथम पुष्प देऊन सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. या प्रसंगी, पहेलगाव येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना सामूहिकपणे श्रद्धांजली वाहण्यात आली, ज्यामुळे वातावरणात एक गंभीरता व आपुलकीची भावना दाटून आली. त्यानंतर सर्वांप्रति आदर प्रेम भावनाच्या अनुषंगाने कराओके च्या माध्यमातून श्री चोचे यांच्या मुख्य आवाजाने आणि सामुदायिक कोरसने पुढील प्रार्थना म्हणण्यात आली. “हिच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे” या प्रार्थने नुसार पूर्ण कार्यक्रम बहरत गेला.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवर ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.मोगल यांच्या शुभेच्छा संदेशाने झाले. त्यांच्याबरोबर श्री. गवंडी, श्री. मस्के, इंदुलकर मॅडम आणि श्री. कुलकर्णी यांनीही आपले प्रेरणादायी शब्द व्यक्त करून कार्यक्रमाला ऊर्जा दिली. नाश्त्याचा आस्वाद घेतल्यानंतर सर्व सभासदांनी थार गाडीतून रंजक जंगल सफरीचा अनुभव घेतला. यामध्ये लोटेश्वर मंदिर आणि परिसर दर्शनाने भक्तीचा आणि निसर्गसौंदर्याचा सुरेख संगम साधला. महिला सभासदांनी तर थार गाडी सफारीचा विशेष आनंद लुटला. स्विमिंग पूलमध्ये जलक्रीडा करताना सर्वांनी बालपणाचा उत्स्फूर्त आनंद अनुभवला. सर्वच उपक्रमांमध्ये श्री. मस्के अग्रभागी होते, तर आयोजन आणि वेळेचे नियोजन आठल्ये मॅडम आणि श्री. चोचे यांनी अत्यंत नेटकेपणाने सांभाळले. दुपारच्या जेवणात सर्वांच्या आवडीप्रमाणे शाकाहारी व मांसाहारी भोजनाची व्यवस्था होती. जेवणानंतर थोडी विश्रांती घेऊन विविध फन गेम्स आयोजित करण्यात आले, जिथे श्री.मस्के आणि इतर सभासदांनीही भरभरून सहभाग घेतला. गप्पा गोष्टी आणि मनमोकळ्या मनोगतांनी वातावरण अधिकच रंगतदार झाले.
या खास प्रसंगी श्री. भावे यांनी स्वतःच्या खर्चाने उपस्थित सर्व 34 सभासदांना उत्कृष्ट स्मृतीचिन्ह देऊन हा दिवस अधिक संस्मरणीय केला. तसेच आयोजन समितीच्या श्री. कोल्हापुरे यांच्या संकल्पनेतून एग्रो टुरिझम व्यवस्थापनाला ‘सोनचाफ्याचे झाड’ भेट देण्यात आले, जे आजच्या या खास क्षणाचे कायमस्वरूपी साक्षीदार ठरेल. कार्यक्रमाच्या अखेरीस बोटिंगचा मनमुराद आनंद घेतला गेला. या दरम्यान संदीप पावसकर यांच्या “कोण म्हणतो बेवड्याला मान नाही” या मिश्किल कवितेने आणि हास्यविनोदाच्या लाटांनी संपूर्ण वातावरण भावनिक आणि हास्यमय झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीतील प्रत्येक सदस्याने विशेष मेहनत घेतली, विशेषतः आठल्ये मॅडम, श्री. चोचे, श्री. फेपडे आणि श्री. कोल्हापुरे यांनी आपापल्या जबाबदाऱ्या अतिशय योग्य प्रकारे निभावल्या. ‘ग्रुप एकत्रिकरण’ चे महत्वाचे कार्य आठल्ये मॅडम यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत यशस्वीपणे पार पडले. संगमेश्वर उपविभागातून महावितरण कंपनीमध्ये इतर झोनमध्ये गेलेले कर्मचारी उपस्थित झाले, त्याआर्थी त्यांचे संगमेश्वर उपविभागप्रति आणि कोकणाच्याप्रति प्रेम दिसून येते. यामध्ये श्री. घुले, इंदुलकर मॅडम आणि श्री. कुलकर्णी यांचा विशेष उल्लेख करणे आवश्यक वाटते. श्री. घुले यांच्या मिस्कील आणि नेहमीच्याच पद्धतीने हळुवार चिमटे काढून हसतखेळत निवेदकाने वातावरण हसतंखेळतं ठेवलं.
कार्यक्रमाचा समारोप थंडगार आईस्क्रीम आणि चहाच्या स्वादिष्ट मैफिलीने करण्यात आला. हापूस एग्रो टुरिझम चे मालक श्री नागवेकर यांनी आणि त्यांचे कर्मचारी यांनी आमच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये उत्तम सहकार्य केले. शाकाहारी मांसाहारी जेवण तर खासच. अतिथी देवो भव या उक्ती प्रमाणे त्यांनी या सर्व सभासदांची मनोभावे सेवा केली.