(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील मातोश्री कमलाबाई विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कुवारबाव येथे नुकतेच करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमात प्रा. मिलिंद कडवईकर यांनी “दहावी-बारावीनंतर पुढे काय?” या महत्त्वपूर्ण विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
प्रा. कडवईकर यांनी करिअर निवडीचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, “करिअर निवड ही केवळ नोकरी मिळविण्याची प्रक्रिया नसून, स्वतःची खरी ओळख घडविण्याचा प्रवास आहे.” करिअर निवडताना आपल्या आवडी व क्षमतेचा विचार करणे गरजेचे आहे, तसेच निवडलेल्या क्षेत्रातील संधींचा अभ्यास करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वतःची आवड ओळखण्यासाठी अंतर्मुख होण्याचा सल्ला देत त्यांनी अनेक महान व्यक्तींच्या प्रेरणादायी कथा उलगडून दाखवल्या. “लहान वयात ध्येयनिश्चिती केली तर यशाच्या शिखरावर पोहोचणे सहज शक्य होते. त्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास व सातत्याची गरज आहे,” असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या संचालिका नंदा शेलार यांच्या प्रास्ताविकाने झाली. भाग्यश्री राणे यांनी कार्यक्रमाचे सुरळीत सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन हर्षदा शिरोडकर यांनी केले. या वेळी मुख्याध्यापिका विभावरी जोईल, सर्व शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.