(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील हातखंबा येथे महामार्गाचे काम करणाऱ्या कामगाराने दारुच्या नशेत गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. रबीउल इद्रीसअली इस्लाम (वय ३८), मूळ रहिवासी राजापूर, ता. मालदाह, राज्य पश्चिम बंगाल व सध्या हातखंबा येथे वास्तव्यास असलेल्या या कामगाराने आपले जीवन संपवले.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील ब्रिजचे काम सुरू आहे. रबीउल इस्लाम हा ब्रीजच्या कामानिमित हातखंबा येथेच त्याच्या साथीदार कामगारांसोबत राहत होता. त्याला दारुचे व्यसन होते. २५ एप्रिल रोजी रात्री दारुच्या नशेत तो आपल्या राहत्या रुममधून बाहेर पडला होता. बराच वेळ उलटूनही तो परत न आल्याने परिचितांनी शोधाशोध सुरू केली. अखेर, प्रशांत कदम यांच्या हातखंबा कदमवाडी येथील आंब्याच्या बागेत, आंब्याच्या झाडाच्या फांदीला रस्सीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला. आत्महत्येचे खबर गावात पसरताच पोलिस पाटील सनगरे मॅडम यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत त्यांनी तातडीने ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. काही मिनिटात ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ३३/२०२५ अन्वये नोंद करण्यात आली आहे. हा प्रकार दि. २५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजल्यापासून ते २६ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.