(रत्नागिरी / प्रतिनिधी)
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या अमानवी कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी शनिवारी मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी यांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सावरकर नाट्यगृह प्रांगणात झालेल्या या शोकसभेला विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी तसेच शेकडो रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी ऑनलाईन संवाद साधत हल्ल्यातील मृतांना आदरांजली अर्पण केली. त्यांनी म्हटले की, “या क्रूर हल्ल्याला जबाबदार प्रवृत्तीला आपण सर्वांनी मिळून ठेचून काढले पाहिजे. एकतेच्या बळावर देशाचा विश्वास वृद्धिंगत करायला हवा. केंद्र सरकार याला ठोस प्रत्युत्तर देईल आणि दहशतवादाच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल.”
शोकसभेत पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही उपस्थितांना संबोधित करत म्हटले, “पहलगाममधील या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही अतिशय गंभीर घटना असून, अशा संकटाच्या काळात सर्वांनी एकजुटीने उभे राहणे गरजेचे आहे.”
कार्यक्रमात कर्नल प्रशांत चतुर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, तहसीलदार राजाराम म्हात्रे, तसेच विविध शासकीय अधिकारी, माजी सैनिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, मेडिकल आणि नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि शेकडो रत्नागिरीकर नागरिक उपस्थित होते.
शोकसभेदरम्यान “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मराठी पत्रकार परिषद रत्नागिरीच्या संपूर्ण टीमने या शोकसभेत सक्रीय सहभाग नोंदवला.