(रत्नागिरी)
जिल्ह्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडवणारी घटना मंगळवारी (२७ मे २०२५) मंडणगड येथे घडली. एका शेतजमिनीच्या फेरफार नोंदीसाठी आणि सातबारा उताऱ्यासाठी ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महसूल विभागाचे तीन कर्मचारी — मंडळ अधिकारी अमित शिगवण, ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे आणि उप कोषागार कार्यालयातील शिपाई मारुती भोसले — लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) रत्नागिरी युनिटने रंगेहात पकडले.
प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदाराने आपल्या पत्नीच्या नावे मौजे शेणाळे, ता. मंडणगड येथे लिलावातून शेतजमीन खरेदी केली होती. त्याची फेरफार नोंद करण्यासाठी व सातबारा उतारा मिळवण्यासाठी शिपाई मारुती भोसले यांनी ५०,००० रुपयांची मागणी केली होती. तक्रार देण्यापूर्वीच ४५,००० रुपये ऑनलाइन स्वीकारण्यात आले होते. मात्र, पूर्ण रक्कम न दिल्याने मंडळ अधिकारी शिगवण यांनी फेरफार नोंद रद्द केली होती.
त्यानंतर, तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. पडताळणी दरम्यान, शिगवण यांनी उर्वरित ३०,००० रुपयांची मागणी केली. ही रक्कम स्वीकारताना, त्यांनी स्वतःसाठी १५,५०० रुपये घेतले व उर्वरित १४,५०० रुपये तलाठी श्रीरामे यांना दिले.
लाच स्वीकारण्याची ही संपूर्ण कारवाई एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष केली आणि तिघांनाही रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक संजय गोवीलकर आणि सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, रत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या घटनेमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला आहे.
एसीबी रत्नागिरी यांचा नागरिकांना आवाहन:
कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी व्यक्ती लाच मागत असल्यास, त्वरित टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.