( देवरुख )
‘प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः’ हे ब्रीद घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने मागील दशकात देशातील बहुसंख्य नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. ‘सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ या त्रिसूत्री कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात सरकार, प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून संघटनेचे पदाधिकारी करताना देशभर पहायला मिळत आहे. यामुळेच भाजपाकडे सक्रिय कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण झाली असल्याचे भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता जाधव यांनी प्रतिपादन केले.
नुकतीच जिल्ह्यातील १२ मंडलांच्या तालुकाध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडली. अनेक इच्छुक कार्यकर्त्यांमधून ही निवड करायची असल्याने पक्षश्रेष्ठींना निःपक्षपातीपणे आणि निकोप वातावरण निर्माण करण्यासाठी मेहनत घेणे क्रमप्राप्त होते. यासाठी निरीक्षकांची निवड करून त्यांना स्वतंत्रपणे परिस्थितीचे अवलोकन करण्याची मुभा देऊनच या निवडी झाल्याने पक्षाचे कार्य सुलभ झाले.
यामध्ये संगमेश्वर उत्तरचे तालुकाध्यक्ष श्री. विनोद म्हस्के, संगमेश्वर दक्षिणचे तालुकाध्यक्ष श्री. रुपेश कदम, रत्नागिरी दक्षिणचे तालुकाध्यक्ष श्री. संयोग (दादा) दळी, रत्नागिरी उत्तरचे तालुकाध्यक्ष श्री. विवेक सुर्वे यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा नेतृत्त्वाची धुरा सोपवली आहे. लोकसभा, पदवीधर निवडणूक आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणावी लागेल.
यावेळी चिपळूण ग्रामीण विनोद भुरण, चिपळूण शहर शशिकांत मोदी, रत्नागिरी शहर परशुराम ढेकणे, लांजा दक्षिण शैलेश खामकर, राजापूर पश्चिम मोहन घुमे, लांजा उत्तर विराज हरमाले, राजापूर पूर्व ऍड. एकनाथ मुंढे, रत्नागिरी मध्य प्रतिक देसाई यांचीही तालुकाध्यक्ष म्हणून वर्णी लागल्याने संघटनेच्या कामात नवीन चैतन्य निर्माण होईल असा विश्वास सौ. जाधव यांनी व्यक्त केला.
त्या म्हणाल्या, “भाजपा जनतेला समर्पित पक्ष आहे. याचे भान प्रत्येक तालुकाध्यक्षाला आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली छाप सोडून जनकल्याणाचे व्रत अव्याहत सुरू ठेवेल.”