(मुंबई)
महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ६ डिसेंबर रोजी शपथ घेतली. याचवेळी एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार करून खातेवाटप करण्यात आले. त्यानंतर फडणवीस सरकारने त्वरित पुढील १०० दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या संदर्भातील माहिती X अकाऊंटवरून दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या शंभर दिवसांच्या आढावा कार्यक्रमात राज्यातील ८ विभागांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे या आठ विभागांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे पाच विभाग आहेत, तर दोन भाजपचे आणि एक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विभाग आहे.
या कार्यक्रमाचा उद्देश राज्य शासनाच्या कार्यप्रणालीचा सखोल आढावा घेणे आणि नागरिकांपर्यंत योजनांचा प्रभावी लाभ पोहोचवण्याचे मूल्यांकन करणे हा होता. केंद्र सरकारच्या क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेमार्फत या सर्व विभागांचे लेखापरीक्षण करण्यात आले. ५९ विभागांपैकी सर्वोत्तम ८ विभागांची निवड करण्यात आली असून यापैकी श्रेेष्ठ तीन विभागांची अंतिम निवड लवकरच होणार आहे.
शिंदे गटाचे पाच विभाग आघाडीवर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पाच विभागांनी आघाडी घेतली आहे. हे विभाग खालीलप्रमाणे:
-
सार्वजनिक बांधकाम विभाग – एकनाथ शिंदे
-
परिवहन विभाग – प्रताप सरनाईक
-
सार्वजनिक आरोग्य विभाग – प्रकाश आबिटकर
-
उद्योग विभाग – उदय सामंत
-
गृहनिर्माण विभाग – एकनाथ शिंदे
भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग
भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऊर्जा विभाग आणि जयकुमार गोरे यांचा ग्रामविकास विभाग यांची निवड झाली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका विभागालाही स्थान मिळाले आहे.
या निकालांवरून शिंदे गटाच्या मंत्र्यांनी शंभर दिवसांच्या कालावधीत प्रभावी आणि कार्यक्षम कारभार केल्याचे अधोरेखित होते. आता या आठ विभागांतून सर्वाधिक कार्यक्षम असलेले शीर्ष तीन विभाग निवडले जाणार आहेत.