(चिपळूण / प्रतिनिधी)
तालुक्यातील खडपोली रामवाडी येथे शुक्रवारी (दि. २५ एप्रिल) दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास वाशिष्ठी नदीत दुर्दैवी घटना घडली. नदीत बुडणाऱ्या आठ वर्षांच्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची आई व आत्याचा समवेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये लता शशिकांत कदम (३५), लक्ष्मण शशिकांत कदम (८) आणि रेणुका धोंडीराम शिंदे (४५) यांचा समावेश आहे. हे तिघेही कपडे धुण्यासाठी डोहाजवळ गेले होते. यावेळी लक्ष्मण पाण्यात खेळत असताना तो बुडू लागला. हे लक्षात येताच त्याची आई लता कदम यांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्या स्वतःही बुडू लागल्या. आई व मुलाला वाचवण्यासाठी रेणुका शिंदे यांनीही पाण्यात उडी घेतली, पण दुर्दैवाने तिघेही पाण्यात बुडाले. ग्रामस्थांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी ठरला नाही.
घटनेची माहिती मिळताच अलोरे शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून त्यांना दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आणि त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक भारत पाटील करत आहेत.