(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गया (बिहार) येथे ४ ते १५ मे या कालावधीत होणाऱ्या १९ वर्षांखालील सहाव्या खेलो इंडिया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी रत्नागिरीची दिव्या पालये हिची महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली आहे.
देशातील गुणवत्तापूर्ण खेळाडू घडवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये खो-खो या पारंपरिक क्रीडाप्रकाराचाही समावेश आहे. यासाठी राज्यस्तरावर निवड चाचण्या घेतल्या जातात. नुकत्याच पुण्यातील बालेवाडी क्रीडांगणावर पार पडलेल्या निवड चाचणीत दिव्या हिने उत्तम कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवले.
दिव्या सध्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीमध्ये शिक्षण घेत असून, तिला राष्ट्रीय खो-खो प्रशिक्षक पंकज चवंडे, राज्य खो-खो असोसिएशनचे माजी सचिव संदीप तावडे, क्रीडाशिक्षक विनोद मयेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
दिव्याच्या यशानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य मकरंद साखळकर, उपप्राचार्य सुनील गोसावी, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तसेच क्रीडा मार्गदर्शक लीना घाडीगावकर व राकेश मालप यांचेही योगदान महत्त्वाचे ठरले.