(सोलापूर)
सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिलला स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यासाठी त्यांना एका महिलेने प्रवृत्त केल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं होतं. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू करत या महिलेला अटक केली आहे. तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या असून त्यानंतर आता ही आत्महत्या नेमकी या महिलेमुळे झाली की गृहकलहांमुळे झाली असे प्रश्न उपस्थित होत आहे.
मनीषा मुसळे-माने या महिलेच्या मानसिक त्रासामुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहिलंय. सदर महिला ही वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये कर्मचारी होती. गेल्या 17 वर्षांपासून ती हॉस्पिटलमध्ये कार्यरत होती. कामाच्या माध्यमातून तिने वळसंगकर आणि त्यांच्या कुटुंबियांवर प्रभाव पाडला. त्यामुळेच वळसंगकर यांनीच तिला प्रशासकीय प्रमुख केले. मनिषा यांचे वळसंगकर यांच्याशी खूप चांगले संबंध असल्यामुळे त्यांना डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मानसकन्या म्हटलं जात असल्याचेही चर्चा आहेत. इतक्या वर्षांत वळसंगकर कुटुंबीयांनी तिच्याबद्दल कधीच तक्रार केली नाही. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मनीषा यांची हॉस्पिटलमधील अरेरावी वाढली असल्याबाबत वळसंगकर कुटुंबीयांचे म्हणणे होते. स्वतःचं हॉस्पिटल असल्यासारखं त्या वागत होत्या, त्यामुळेच अशा काही कारणांमुळे त्यांना कामावरून कमी करण्यात आलं. त्यानंतरच या महिलेने वळसंगकर यांना मानसिक त्रास दिल्याचं बोललं जात आहे. तर ही महिला वळसंगकर यांच्या अंत्ययात्रेलाही हजर असल्याच स्थानिकांचं म्हणणं आहे.
सुरुवातीपासून या प्रकरणात केवळ या महिलेचाच हात असल्याची चर्चा होती. मात्र आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. या महिलेच्या वकिलांनी वळसंगकर कुटुंबीयांवर गंभीर आरोप करत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. तर त्यांच्या आरोपांवरून वळसंगकर यांच्या आत्महत्या मागे नैराश्य आणि गृहकलह हे कारण असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान पोलिसांनी डॉ. शिरीष वळसंगकर आणि संशयित आरोपी मनीषा मुसळे माने हिचा मोबाईल जप्त केला आहे. मुसळे-माने हिच्या मोबाईलमध्ये वळसंगकर कुटुंबातील काही सदस्यांसोबतचे संभाषण आणि व्हॉट्स ॲप चॅटिंग असल्याचे सांगितले जात आहे.
वळसंकर यांच्या कुटुंबातील सदस्यांनीच त्यांना हॉस्पिटलच्या आर्थिक व्यवहारातून बेदखल केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळेच ते गेल्या वर्षभरापासून मानसिक तणावाखाली होते, अअसे दबक्या आवाजात बोलले जात आहे. गृहकलहामुळे ते अतिशय त्रस्त झाले होते, नैराश्यात गेले होते. कुटुंबीय आणि डॉक्टरांमध्ये सारं काही अलबेल नसल्याचे प्रसंग त्यांचे निकटवर्तीयही खासगीत सांगत आहेत. आत्महत्येच्या दिवशीही ते आपल्या पत्नी आणि मुली सोबत घरात बोलत बसलेले होते. मात्र अचानक ते बाथरूम मध्ये गेले. आणि त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्यादिवशी घरात नेमकं काय घडलं होतं ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
मनीषा मुसळे-माने हिने १७ एप्रिल रोजी डॉक्टरांना मेल पाठवून आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. माझा पगार कमी केला, अधिकारही कमी केले, त्यामुळे मी दोन्ही मुलांना मारणार आणि हॉस्पिटलमध्ये येऊन पेटवून घेणार. माझ्याबद्दल चुकीचे आणि खोटे पसरविले जात आहे. त्याला स्टाफमधील लोक आणि वळसंगकर कुटुंबीय जबाबदार राहाल, असा मेल मनीषा मुसळे माने हिने केला होता. त्यानंतर डॉक्टरांनी मुसळे-माने हिला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले होते. त्यावेळी तिने माफीही मागितली होती. पण त्याच दुसऱ्याच दिवशी डॉ. वळसंंगकर यांनी आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागचे गूढ वाढले आहे.
डॉ. वळसंगकर यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत ‘ज्या माणसाला मी शिकवून ‘एओ’ (प्रशासकीय अधिकारी) केले, चांगला पगार दिला, त्यानेच माझ्यावर घाणेरडे आरोप करून मला धमकावले, त्याचे मला अतीव दु:ख आहे. म्हणून मी जीवन संपवत आहे’ असे चिठ्ठीत म्हटले होते. त्याखाली शिरीष असे लिहिले असून मुसळेचाही उल्लेख आहे.
वळसंगकर यांच्या गृहकलहातील अनेक गोपनीय गोष्टी मनीषा यांना माहीत होत्या. त्या संदर्भात मनीषा यांच्या मोबाईलमध्ये काही मेसेज व ऑडिओ क्लिप असल्याचा दावा त्यांनी स्वत: त्यांच्या वकिलांकडे केला आहे. पण पोलिसांनी मोबाईल जप्त केल्यामुळे हे पुरावे अजून हाती लागलेले नाहीत असं या महिलेच्या वकिलांनी सांगितलं. तर दुसरीकडे गृहकलह लपवण्यासाठीच या महिलेला या प्रकरणात गोवल जात असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. त्यामुळे वळसंगकर यांचे त्यांच्या आत्महत्यामागे ती महिला आहे की कुटुंबीय आहेत ? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.