(राजापूर)
देश आणि कोकणाला जोडणारा सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील अनुस्कुरा घाट हा प्राचीन व्यापारी आणि धार्मिक प्रवासाचा महत्त्वाचा मार्ग असून, त्याचे अस्तित्व सातवाहन काळापासून म्हणजे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीपासून आहे. पक्क्या फरसबंदी रचनेचा हा घाटमार्ग मध्ययुगीन काळातही तितकाच महत्त्वाचा होता.
या घाटातून प्रवास करणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी तत्कालीन काळात संरक्षक फौज ठेवण्यात आली होती. अशा फौजेची माहिती देणारा १७व्या शतकातील देवनागरी लिपीत कोरलेला शिलालेख अलीकडेच उजेडात आला आहे. शिलालेख तज्ज्ञ अनिल दुधाणे आणि अथर्व पिंगळे यांनी या शिलालेखाचा अभ्यास केला असून, दुर्ग अभ्यासक भगवान चिले आणि प्रतीक पाटील यांनी वाचनाचे सहकार्य केले आहे.
हा शिलालेख कोल्हापूर जिल्ह्यातील चौकवाडी (ता. शाहूवाडी) गावाजवळील उगवाई देवी मंदिर परिसरात, घाटाच्या उतारावर एका ओबडधोबड दगडावर कोरलेला आहे. शिलालेखात ‘कालो (कोळी) सदाशिव’ नावाचा उल्लेख आहे. तो कदाचित महादेव कोळी समाजातील वीर असावा, ज्याने या भागात युवकांना युद्ध प्रशिक्षण देऊन शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी संरक्षण पथक उभारले होते.
शिलालेखात ‘देघिन’ हा तुर्की शब्द आढळतो, ज्याचा अर्थ ‘तुर्की फौज’ असा होतो. यावरून त्या काळात तुर्की आक्रमकांपासून संरक्षणाची आवश्यकता होती, हे स्पष्ट होते. शिलेवर एका वीराच्या वज्रप्रहार करतानाचे शिल्पही कोरले आहे, जे या घाटमार्गाच्या संरक्षणाच्या ऐतिहासिक महत्त्वाची साक्ष देते.
या संशोधनासाठी ‘कोल्हापूर गॅझेटर’, ‘शिवछत्रपतींचे चरित्र’, ‘कोकणच्या इतिहासाची साधने’, ‘सभासद बखर’ आणि ‘विशाळगड त्रयोदशी’ यांसारख्या ऐतिहासिक ग्रंथांचा आधार घेण्यात आला आहे.
अनुस्कुरा घाट हा राजापूर बंदरातून कोकणात प्रवेश करणाऱ्या आणि देशात जाणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा मार्ग होता. शिलाहार राजा भोज यांनी घाटावर नजर ठेवण्यासाठी विशाळगड बांधला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ साली पन्हाळगडासह विशाळगड जिंकून संपूर्ण परिसरावर ताबा मिळवला होता.