रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या स्फोटक अर्धशतकांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा ९ विकेट्सने पराभव केला. वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, सीएसके संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकांत १७६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल, मुंबई संघाने केवळ १५.४ षटकांत १७७ धावा करून सामना जिंकला. या हंगामात मुंबईचा ८ सामन्यांमधील हा चौथा विजय आहे. तर सीएसकेला या हंगामात सहावा पराभव पत्करावा लागला आहे.
सीएसके विरुद्धच्या या सामन्यात, रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी इम्पॅक्ट सब म्हणून मैदानावर आला होता. रायन रिकल्टनसोबत डावाची सुरुवात करणाऱ्या रोहित शर्माने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक वृत्ती दाखवायला सुरुवात केली. शानदार फलंदाजी करत रोहित शर्माने फक्त ३३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहित शर्माचे हे या हंगामातील पहिले अर्धशतक होते. मुंबईकडून रोहितने ४५ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांसह ७६ धावा करत नाबाद राहिला.
मुंबई इंडियन्सचा रोहित शर्माच नाही तर सूर्यकुमार यादवही वानखेडेवर वादळ निर्माण करताना दिसला. सूर्यकुमारने रोहित शर्मासोबत मिळून फक्त २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अशाप्रकारे, सूर्यकुमार यादवने मुंबईकडून शेवटी फलंदाजी करताना सामना संपवला. मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवने ३० चेंडूत ६८ धावा केल्या. सूर्यकुमारने त्याच्या डावात ६ चौकार आणि ४ षटकारही मारले. मुंबईकडून सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त रायन रिकेल्टनने १९ चेंडूत २४ धावांचे योगदान दिले.
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जची गोलंदाजी अगदी सामान्य होती. रवींद्र जडेजा वगळता सीएसकेचा दुसरा कोणताही गोलंदाज विकेट घेण्यात यशस्वी झाला नाही. याशिवाय, या सामन्यात एमएस धोनीच्या कर्णधारपदाची जादूही चालली नाही. धोनीने संघातील त्याचा सर्वात महत्वाचा गोलंदाज मथिशा पाथिराणाला १४ वे षटक टाकण्यासाठी बोलावले. या कारणामुळेही सीएसके सामन्यात मागे पडले.
या सामन्यात सीएसके ची फलंदाजी अत्यंत सुमार झाली. सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर सीएसकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फलंदाज रचिन रवींद्र फक्त ५ धावा करून बाद झाला. तथापि, यानंतर, १७ वर्षीय आयुष म्हात्रेने १५ चेंडूत ३२ धावा करून संघासाठी काही आशा जागवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो संघासाठी पुरेसा ठरला नाही.