(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर खातेदारांनी पूर्ण विश्वास दाखवला आहे. सरत्या आर्थिक वर्षामध्ये बँकेला ९४.६४ कोटी रुपयांचा ऐतिहासिक ढोबळ नफा झाला आहे. बॅंकेच्या ठेवी २८६६.८७ कोटी रुपये, कर्जव्यवहार २१९९.६३ कोटी असा ५०६६.५१ कोटी एकूण व्यवसाय झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बँकेचा तब्बल 5 हजार कोटींच्या पुढे व्यवसाय गेला आहे. यावर्षी बँकेच्या इतिहासात प्रथमच 94 कोटी 64 लाख रुपये इतका विक्रमी असा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती आरडीसी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी दिली.
बॅंकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात आज दुपारी पत्रकार परिषदेत डॉ. चोरगे यांनी बॅंकेचा लेखाजोखा सादर केला. बॅंकेचे कार्यक्षेत्र रत्नागिरी जिल्हा असून ९ तालुक्यांत ७६ शाखा, प्रधान कार्यालय असे विस्तारलेले आहे. २८ शाखा स्वमालकीच्या जागेमध्ये बॅंकेच्या बहुतांश शाखा ग्रामीण भागांतील सर्वांना सुविधा देत आहेत. डॉ. चोरगे म्हणाले की, बॅंकेच्या गतवर्षीच्या तुलनेत ठेवींमध्ये २३०.७० कोटीने, कर्जव्यवहारात १९५.३४ कोटीने वाढ झाली आहे. बॅंकेच्या व्यवसायामध्ये ४२६.०४ कोटीने वाढ झाली. तसेच ढोबळ नफ्यामध्ये २६.११ कोटीने वाढ झाली आहे.
बॅंकेचा ढोबळ एनपीए २.९१ टक्के असून नक्त एनपीए ०.०० टक्के एवढा आहे. सलग १३ वर्षे हा एनपीए ०.०० टक्के असून सलग १४ वर्षे बॅंकेने अ ऑडिट वर्ग प्राप्त केला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शेती सहकारी संस्थांना रु. ५.०० लाख कमाल मर्यादेपर्यंत संस्था कार्यालय इमारत बांधकामाकरीता आर्थिक मदत देणेत येते. बँकेतर्फे १०० संगणक संच जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक शाळांना देणेचे आश्वासन देणेत आले होते. त्यानुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ५० संगणक संच जिल्हा परिषदेकडे सुपूर्द करणेत आले आहेत. तसेच उर्वरित ५० संगणक संच सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला सुपूर्द करण्यात आले आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेला आतापर्यंत तब्बल 19 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये नाबार्ड, फॅसिलिटेड सीबीएस प्रोगॅ्रम पुरस्कार, महाराष्ट्र शासन सहकार निष्ठ पुरस्कार, बँकींग फ्रंटीयर्स पुरस्कार, महाराष्ट्र शासन सहकार भूषण पुरस्कार, इंटेलिक्चुअल पिपल्स फाऊंडेशन, दिल्ली पुरस्कार आदींचा समावेश आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून बॅंकेने आपत्ती, उत्कृष्ट खेळाडू, अनाथ आश्रम, दिव्यांग मुलांचे वसतीगृह, शेतकरी कार्यशाळा आदी कारणांसाठी ५५.८५ लाख रुपये मदत केली आहे. मुदतीत पूर्णफेड करणाऱ्या प्राथमिक शेती सहकारी संस्थांना व थेट कर्जदारांना त्यांनी आर्थिक वर्षात एकूण दिलेल्या व्याजाच्या रक्कमेत ०.५० टक्के सवलत देण्यात आली आहे. बॅंकेला सरत्या आर्थिक वर्षात लोकसत्ता संघर्ष सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थविश्व पुरस्कार व भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाचा बेस्ट इनोव्हेटीव्ह बॅंक ऑफ दि इयर ॲवॉर्डने गौरवण्यात आले. बँकेने ग्राहकांसाठी जिल्ह्यात १९ ठिकाणी ATM सेंटर कार्यान्वित केली असून, त्याद्वारे ग्राहकांना पैसे काढणे, बॅलन्स चेक करणे, मिनी स्टेटमेंट जनरेट करणे इ. सुविधा देणेत येत आहेत.
पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, ज्येष्ठ संचालक ॲड. दीपक पटवर्धन, रमेश कीर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण, राजेंद्र सुर्वे, म. शं. टिळेकर आदींसह सर्व संचालक उपस्थित होते.