(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवार (२ मे) दुपारी एक गंभीर अपघात घडला. बावनदी पुलाच्या अलीकडे सीएनजी गॅस घेऊन जात असलेला टँकर निवळी घाटात अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला उलटला. या अपघातात टँकरचा चालक विजय कृष्णा इंगळे (वय २१, रा. बुलडाणा) जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना दुपारी घडली, तेव्हा विजय इंगळे हा जयगड येथून सीएनजी गॅस घेऊन मुंबईच्या दिशेने निघाला होता. मात्र, घाटातील वळणावर नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला. सुदैवाने, टँकरमधील गॅस गळती झाली नाही आणि कोणतीही जीवितहानी टळली. घटनास्थळी तातडीने पोहोचलेल्या ग्रामीण पोलिसांनी बचावकार्य सुरू करून जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले. अपघाताच्या पार्श्वभूमीवर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात केली आहे.