“आमच्यातील वाद किरकोळ असून मी महाराष्ट्राच्या हितासाठी माझा इगो बाजूला ठेवायला तयार आहे”, असं आवाहन करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी साद घातली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर (Actor Mahesh Manjrekar) यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ‘मराठी माणसांसाठी आमच्यातील वाद किरकोळ असून मी महाराष्ट्राच्या हितासाठी माझा इगो बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करण्यास तयार आहे, असे म्हटले होते. राज ठाकरेंच्या या टाळीवर आता उद्धव ठाकरेंनीही हाळी दिली आहे. मात्र, त्यासाठी उद्धव ठाकरेंनी काही अटी शर्ती ठेवल्या आहेत. उद्धव ठाकरे आज श्री छत्रपती महाराज शिवाजी मंदिर स्मारक मंडळ, दादर येथे आयोजित केलेल्या भारतीय कामगार सेनेच्या ५७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत आहे. पण माझी अट एक आहे, जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कारभार घेऊन जात आहेत, तेव्हाच जर विरोध केला असता तर हे सरकार तिकडे बसले नसते. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे सरकार केंद्रात बसवले असते. त्याचवेळेला हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिबा द्यायचा, आता विरोध करायचा. मग तडजोड करायची, हे असं चालणार नाही”, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
पुढे बोलतांना ते म्हणाले की,”महाराष्ट्राच्या हिताच्या जो आड येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याच्या पंगतील बसणार हे आधी ठरवा. मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. माझ्याकडून कुणाशी भांडणे नव्हतीत, पण मी मिटवून टाकली चला. त्यावेळी सर्व मराठी माणसांनी ठरवायचे भाजपसोबत जायचे की शिवसेनेसोबत म्हणजे एसंशी, गद्दार नव्हे तर माझ्यासोबत जायचं”, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
मुलाखतीत नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे?
आज शिवसेना फुटली पण जर फुटली नसती तर, अजुनही तुम्ही (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) एकत्र येऊ शकतात का? हे संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न आहे असे मांजरेकर म्हणाले. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडण छोटी असून, महाराष्ट्र खूप मोठा असल्याचे उत्तर राज ठाकरेंनी दिले आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तिस्वासाठी ही भांडणं, वाद सर्व गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही फार काही कठीण गोष्ट आहे असे मला वाटत नाही. परंतु, विषय फक्त इच्छेचा असून, हा फक्त माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचापण विषय नसून, आपण महाराष्ट्राचा लार्जर पिक्चर पाहणे गरजेचे आहे आणि तो मी पाहतोच असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. मी त्यांच्याबरोबर काम करावं? ही उद्धव ठाकरेंनी इच्छा आहे का? असा प्रश्नही राज यांनी विचारला आहे.