(गणपतीपुळे / वैभव पवार)
महाराष्ट्र शासनाच्या वतीने वाचन चळवळ वाढीस लागावी आणि साहित्य चळवळ वृंद्धीगत व्हावी यासाठी पुस्तकांचे गाव हा उपक्रम सुरू केला आहे. यानुसार महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री नामदार डॉ. उदयजी सामंत यांनी मालगुंड हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून जाहीर केले. त्यानुसार महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या पुस्तकांचे गाव – मालगुंड या उपक्रमाचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा रविवार, दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांच्या शुभहस्ते कवी केशवसुत स्मारक मालगुंड याठिकाणी होणार आहे.
या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये जाणीवजागृती व्हावी आणि हा उपक्रम उत्साहाच्या वातावरणात संपन्न व्हावा या अनुषंगाने कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीने आणि मालगुंड गावातील साहित्यप्रेमी मंडळी यांनी केलेल्या विनंतीनुसार मालगुंड ग्रामपंचायतीने नुकतीच सरपंच श्वेता शेखर खेऊर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा निमंत्रित केली होती.
या ग्रामसभेस सुरुवातीला उपस्थित सर्वांचे ग्रामसेवक आर. पी. प्रक्षाळे यांनी स्वागत करून सभेचे प्रास्ताविक केले. त्यानंतर कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा माजी सभापती प्रकाश साळवी यांनी मालगुंड हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून जाहीर केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आणि यासाठी पुढाकार घेऊन सातत्याने पाठपुरावा करणारे महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री, उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ. उदयजी सामंत यांच्या धन्यवादाचा ठराव मांडला. या ठरावास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यानंतर कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी यावेळी पुस्तकांचे गाव ही संकल्पना सभेसमोर मांडून याचे स्वरूप स्पष्ट करून मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांनी मालगुंड गावाची केलेली निवड सार्थ ठरविण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याने या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी उपस्थित भाषाप्रेमी यांनी विचारलेल्या प्रश्नांना आणि या उपक्रमाच्या विविध बाबींची माहिती गजानन पाटील, प्रकाश साळवी, सरपंच श्वेता खेऊर, उपसरपंच स्मिता दुर्गवळी, मालगुंड शाखेच्या कार्याध्यक्षा शुभदा मुळ्ये, सचिव विलास राणे, सहसचिव रामानंद लिमये, युवाशक्तीचे दक्षिण कोकण प्रमुख अरुण मोर्ये, पत्रकार वैभव पवार, शेखर खेऊर यांनी दिली. सभेला मालगुंड ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, भाषाप्रेमी, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
पुस्तकांचे गाव या स्तुत्य उपक्रमासाठी नामदार उदय सामंत साहेबांनी मालगुंड गावाची निवड केली आहे ही आमच्या सर्व मालगुंडवासीयांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांचे ऋणी आहोत. विशेष म्हणजे माझ्या कारकिर्दीत हा उपक्रम साकारला जात आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे. या माध्यमातून माझी सर्व मालगुंडवासीयांना आणि समस्त भाषाप्रेमी यांना विनंती आहे की, यांनी या उपक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.
सौ. श्वेता शेखर खेऊर, सरपंच,
ग्रामपंचायत मालगुंड