(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील हातखंबा येथे बौध्दवाडीच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीदिवशी रस्त्यालगत लावलेला बॅनर एका मुलाने फाडल्याची निंदनीय घटना घडली. ही घटना 14 एप्रिल 2025 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडल्याने मध्यरात्री तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. जयंतीचा बॅनर फाडल्याची खबर बौध्दवाडीमद्ये कळताच लहानग्यांपासून ते वयोवृध्दपर्यंत सर्वच ग्रामस्थ मध्यरात्री एकवटले होते. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मध्यरात्री साडेतीन वाजेपर्यंत हातखंबा गावात महिलांसह ग्रामस्थ ठाण मांडून बसले होते.
या घटनेची माहिती हातखंबा गावच्या पोलीस पाटील सनगरे मॅडम यांना मिळताच त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेत तात्काळ घडलेल्या प्रकाराची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यादव हे दाखल होऊन पोलीस फौजफाटा देखील घटनास्थळी तैनात करण्यात आला होता. यावेळी बौद्धवाडीमधील महीला देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून संताप व्यक्त करण्यात येत होता. संतप्त झालेल्या बौद्ध ग्रामस्थासह महिलांचा रोष पाहून पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले. संतप्त झालेल्या जमावाकडून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तत्काळ या भागात बसवलेले सीसीटीव्ही तपासण्याचे काम हाती घेतले.
दुसरीकडून जमावाला शांत करण्याचे काम देखील पोलीसांकडून सुरू होते. अती संवेदनशील प्रकरण असल्याने पोलीस उपविभागीय अधिकारी माईंनकर हेही मध्यरात्री हातखंबा येथे दाखल झाले. दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर एक मुलगा रस्त्यावरून चालत जात असताना बॅनर फाडत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसून आले आहे. त्याचे वय १२ असून हातखंबा येथे तो भाड्याच्या खोलीत आई वडिलांसह राहत असल्याचे समजते. मात्र या मुलाने जाणीवपूर्वक कृत्य केले आहे का? त्याला कृत्य करणाऱ्यास कोणी इतर व्यक्तीने सांगितले आहे का? तो रात्री साडेदहा वाजता बाहेर कोणत्या कारणासाठी पडला? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
यासंदर्भात पोलीस निरीक्षक यादव यांना घटनेची माहिती घेण्यास संपर्क केला असता त्यांनी कृत्य करणाऱ्या त्या मुलाला व पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते. संतप्त झालेल्या बौद्ध ग्रामस्थांनी कृत्य करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी दुसऱ्या दिवशी लावून धरली. बौद्ध ग्रामस्थांनी (दिनांक १५ एप्रिल) सकाळीच हातखंबा ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देऊन घडलेल्या घटनेबाबत संताप व्यक्त केला.
भविष्यात असे प्रसंग घडू नये यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या, तसेच कृत्य कारणाऱ्या मुलाचे शाळेत वर्तन कसे आहे याची चौकशी करावी, उच्च तंत्रज्ञानाची व दर्जेदार सुसज्ज सीसीटीव्ही प्रणाली बसविण्यात यावी, अशा विविध मागण्या ग्रामस्थांनी सरपंच जितेंद्र तारवे यांच्याकडे केल्या आहेत. त्यानंतर बौद्ध ग्रामस्थांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल होऊन पोलीस निरीक्षक यादव यांची भेट घेतली. पोलीस निरीक्षक यादव यांनी संबंधीत मुलाला केबिनमध्ये बोलावून त्याला काही प्रश्न विचारले. यावेळी या मुलाने बॅनर मी फाडला आहे अशी थेट ग्रामस्थांसमोर व पोलिसांसमोर कबूली दिली. यावेळी मुलाच्या चौकशीसाठी पोलीस आणखी काही दिवस घेणार असल्याचे बौद्ध ग्रामस्थांना सांगितले आहे. परंतु बॅनर फाडणारा मुलगा अल्पवयीन असल्याने पोलीस कोणती ठोस भूमिका घेतात हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेकडे बौद्ध समाजाचे लक्ष लागून राहिले आहे.
घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता
हातखंबा येथील भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा लावलेला बॅनर अज्ञाताने फाडल्याचे माहिती जिल्हाभर पसरली आहे. बौद्ध समाजातील बांधवांकडून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्यासह राज्यभर उमटण्याची शक्यता आहे.