(बीड)
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी मला ऑफर देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासलेंनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे पोलिस दलात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड सध्या बीड जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात आता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामध्ये सध्या तुरुंगात असलेले आरोपी वाल्मिक कराड याच्या बाबत एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याने खळबळजनक दावा केला आहे. वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर करण्याची मला सुपारी देण्यात आली होती असा दावा या पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. तसेच राज्यात अनेक एन्काऊंटर बोगस होते असेदेखील या अधिकाऱ्याने म्हंटले आहे.
निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कसले यांनी माध्यमांसमोर दावा केला आहे की, त्यांना वाल्मिक कराडच्या ‘एन्काउंटर’ची ऑफर देण्यात आली होती. या दाव्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रणजित कसले यांच्यावर यापूर्वी आर्थिक तडजोडीच्या आरोपाखाली निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र कासले यांनी केलेल्या नव्या दाव्यांमुळे पोलिस यंत्रणेतील अंतर्गत हालचाली आणि हत्याप्रकरणाशी संबंधित तपासाची दिशा बदलू शकते, असे संकेत मिळत आहेत. या प्रकरणात आता आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता असून, संबंधित अधिका-यांकडून या दाव्याची सत्यता तपासली जाणार आहे. या दाव्याची गांभीर्याने दखल घेत पोलिस दलाने आंतरिक चौकशी सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कासलेंच्या या वक्तव्यावर अद्याप कोणत्याही अधिकृत अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, वाल्मिक कराडविरोधातील गुन्हा आणि सध्या सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गेल्या महिन्यातच पोलीस उपनिरीक्षक रणजित कसले यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी त्यांच्याविरोधात निलंबनाचा आदेश जारी केला होता. रणजित कसले हे सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी राज्याबाहेर गेले असता त्यांनी तपासादरम्यान संबंधित प्रकरणात आर्थिक तडजोड केली, असा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती स्थानिक पातळीपुरती न राहता थेट राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिका-यांपर्यंत पोहोचली. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत कासले दोषी आढळून आले. त्यामुळे त्यांच्याविरोधात तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणामुळे पोलीस दलाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अधिका-यांकडून चौकशीची पुढील प्रक्रिया सुरू आहे.
एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी यावर भाष्य केलं आहे. तसचं बोगस एन्काऊंटर कसा केला जातो. त्यात कोण कोण सामील असते, यावरही भाष्य केलं आहे.
कसा असतो बोगस एन्काऊंटर?
मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती. ती ऑफर कशी दिली जाते ते आधी सांगतो. एक लमसम अमाऊंटची ऑफर दिली जाते. 10-20 करोडची ऑफर दिली जाते. तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते. मी सायबर गुन्हे शाखेत होतो. माझा आणि या प्रकरणाचा काही संबंधही नव्हता. पण तरीही माझ्यात गट्स आहेत हे पाहून मला ऑफर दिली गेली. पण मी एन्काऊंटर करण्यास नकार दिला. बोगस एन्काऊंटरसाठी सर्वात आधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहसचिव तीन-चार जणांची गुप्त बैठक होते. त्यानंतर आणखी ६-७ विश्वासू लोकांची टीम निवडली जाते. मग मुंबईतील अक्षय शिंदे प्रकरणात जसा त्याचा एन्काऊंटर झाला तसा ते तीन-चार अधिकारी संबंधित ठिकाणी जातात. एक अधिकारी, एक अंमलदार, एक हवालदार अशी टीम तयार केली जाते. त्यांना लमसम अमाऊंटही दिली जाते. त्यानंतरही जर काही झालचं तर, आमचंच सरकार आहे, असं सागून तुम्हाला खात्यात घेण्याची, नोकरी अबाधित ठेवण्याची शाश्वती दिली जाते. चौकशीतून मुक्त कऱण्याचे आश्वासन दिले जाते.
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर कसा झाला ?
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला, पण अशा आरोपींच्या हातात बेड्या असतात, दोरखंडांने आरोपींचे हात घट्ट बांधलेले असतात, मग तो पोलिसांना मारण्याचा, त्याची पिस्तुल ओढून घेण्याचा कसा प्रयत्न करेल, हे तु्म्हीच सांगा, किती बोगस एन्काऊंटर होता, तुम्हीच सांगा.