(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे गावचे धडाडीचे सरपंच प्रदीप उर्फ बाबू शिंदे यांच्या कार्याची दखल लोक कल्याणासाठी सदैव तत्पर असलेल्या महाराष्ट्र राज्य नालंदा ऑर्गनायजेशनने घेत त्यांना आदर्श सरपंच म्हणुन राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे. यामुळे सरपंच प्रदीप उर्फ बाबू शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
आरोग्य, शिक्षण, कला, राजकीय, सामाजिक, उद्योग, कृषी, क्रीडा, पत्रकार,युवा महिला,आदर्श ग्रामपंचायत अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत कर्तृत्वान व्यक्तींना दरवर्षी नालंद ऑर्गनायजेशन पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते.
प्रदीप शिंदे हे मौजे असुर्डे गावचे सरपंच असून महाविद्यालयीन जीवनापासून त्यांना सामाजिक कार्य करण्याची आवड असून ते नेहमीच समाजकार्यासाठी अग्रस्थानी असतात. गावचे प्रथम नागरिक म्हणुन ते उत्तमपणे आपले कार्य करत असल्याने गावातील ग्रामस्थही त्यांच्या कार्यपद्धतीवर समाधानी आहेत. ते करत असलेल्या कामाची दखल नालंद ऑर्गनायजेशन या राज्यस्तरीय संस्थेने घेत त्यांची राज्यस्तरीय पुरस्कारसाठी निवड केली असून पुरस्कार जाहीर केल्याचे अधिकृत पत्र त्यांना पाठवले आहे.
शनिवार दिनांक 19 एप्रिल रोजी पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे डॉ. शेषराव हिम्मतराव पाटील आय. एफ. एस अधिकारी,श्री. जितेंद्र तुळशीराम दाते चेअरमन अं.आर.जे ग्रुप, मनोज शिवाजी वाबळे अध्यक्ष शब्दधन सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या शाश्वत शेती मारदर्शन कार्यशाळा व महाराष्ट्र रत्न सन्माम सोहळा आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.