( रत्नागिरी )
शहरानजीकच्या भाट्ये पुलावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची ही घटना रविवार 23 मार्च रोजी सायंकाळी 6.15 वा. सुमारास घडली. महेश अनंत पिलणकर (47,रा.टाकळेवाडी फणसोप, रत्नागिरी) असे अपघातात जागीच मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
महेश पिलणकर हा फिनोलेक्स कंपनीत कामाला होते. रविवारी सायंकाळी ते रत्नागिरीत येत असताना भाट्ये पुलावरील चेकपोस्ट नजीक एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती कि, त्यामुळे महेश हा रस्त्यावर फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला गंभिर दुखापत होउन त्याचा जागीच मृत्यू झाला.
आपल्या दुचाकीवरुन रत्नागिरीकडे येत असताना ट्रक चालक बाजू घेऊन जात असताना हा अपघात झाला असल्याचा चर्चा रुग्णालयात होती. मात्र अपघात घडल्याच्या क्षणी याबाबत ट्रक चालकाला माहिती नव्हती. ट्रक चालक काही अंतर गेल्यानंतर नागरिकांनी ट्रक चालकाला थांबविले असे समजते. या अपघातात महेश पिलणकर यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या चेहऱ्याला ट्रक चालकाच्या हौद्याची जोरदार धडक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताची शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. दरम्यान, या अपघातामुळे भाट्ये पुलावर मोठी वाहतुक कोंडी झाली होती.
महेशच्या मृत्यूची माहिती मिळताच टाकळेवाडी-फणसोप येथील त्यांच्या नातेवाईक व मित्रपरिवार, नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली आहे. शहर पोलिस ठाण्यात या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.