(चिपळूण)
बिबटया आणि मानवाचा संघर्ष आता टोकाला पोचला आहे. जंगलात या बिबट्यासाठी अन्नच उपलब्ध नसल्याने तो आपली भूक भागविण्यासाठी मानवी वस्तीत शिरकाव करू लागला आहे. त्यामुळे अनेकदा माणूस स्वतःचा जीव वाचविण्यासाठी प्रतिहल्ला होत आहे. माणूस आणि बिबट्या यातील हा थरारक संघर्ष तालुक्यातील तोंडली-वारेली या दोन गावांच्या मध्यावर शनिवारी मध्यरात्री घडला, यामध्ये आशिष महाजन यांना बिबट्याने नखशिखांत रक्तबंबाळ केले आणि त्यांनीदेखील बिबट्याचा हल्ला परतवून लावताना यामध्ये बिबट्याचा मृत्यू झाला.
हा थरार महाजन यांनी पुन्हा एकदा उभा केला. ते म्हणाले की, आम्ही खरंतर व्यवसायानिमित्त अनेक वर्षे पुण्यात होतो. गेल्या दोनच वर्षापूर्वी वारली आणि तोंडली या दोन गावांच्या हद्दीवर घर बांधले. निसर्गरम्य वातावरणात शांतपणे जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. पत्नी सुप्रिया यांच्याबरोबर आम्ही दोघेच घरात राहात होतो. जंगलमय भाग असल्याने या भागात अनेकदा बिबट्याचे दर्शन होत होते. मात्र, असा प्रसंग कधी ओढवला नव्हता. बिबट्याचा आसपास वावर आहे म्हणून आपण घराजवळ कुत्री पाळली होती तसेच पूर्ण कंपाऊंडदेखील होते. रात्री अपरात्री कुत्रे जास्तच ओरडले तर आपण बाहेर येऊन टेहळणी करीत असे. त्याप्रमाणे शनिवारी मध्यरात्री कुत्र्यांचा आवाज जोरजोरात होऊ लागला. कुत्रे कशामुळे भुंकत आहेत हे पाहण्यासाठी आपण हातात काठी बॅटरी घेऊन बाहेर पडलो, दरवाजा उघडून बाहेर येतो तोच बिबट्याने आपल्यावर झडप घातली. याचवेळी आपण खाली पडलो.
पत्नीही मदतीला धावल्याने वाचलो
आपल्या आसपास भेटेल ही वस्तू घेऊन आपण बिबट्याचा हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न करीत होतो. बिबट्या आणि आपल्यात झटपट सुरु होती. अशाप्रकारे पाच ते सहावेळा ही झटापट झाली, या झटापटीनंतर बिबट्या थोडा दमला यावेळी आपण एक काठी व ऑडक्याच्या सहायाने बिबट्याला एकाच जागी दाबून ठेवले, इतक्यात पत्नीला हाक मारून बोलाविले, तिही मदतीला धावत आली.
बिबट्याने हाताचा चावा घेतला….
पत्नीने घरातील साप मारण्याचे हत्यार आणले. अखेर स्वतःचा जीव वाचला पाहिजे एवढेच ध्यानात घेऊन आपण कामवेरूने हल्ला केला. परंतु याच काळात बिबट्याने आपल्या हाताचा चावादेखील घेतला. त्यानंतर पत्नीच्या मदतीने आपण पुन्हा बिबट्यावर हल्ला चढवला. नंतर काही काळाने ग्रामस्थ देखील मदतीला आले. पत्नीने आरडा -ओरड करून लोकांना बोलावले. यानंतर बिबट्या अंगावर धावून येत होता. तसा आपण त्याचा हल्ला परतवून त्याला मागे फेकत होतो, असा दोन-तीन वेळा आपटल्यावर तो निस्तेज असा एका जागी पडला आणि त्याने या झटापटीत आपला प्राण सोडला.