(कळझोंडी / किशोर पवार)
बिहार येथील बुद्धगया महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे. त्याचबरोबर १४४९ चा बोधगया टेम्पल कायदा रद्द करण्यात यावा अशी आग्रही मागणी रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती रत्नागिरी यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.
सदर निवेदन रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार, सचिव सुहास कांबळे, सहसचिव शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, संस्कार समितीचे अध्यक्ष संजय आयरे, सचिव रविकांत पवार, शिक्षण समितीचे अध्यक्ष जयवंत कदम त्याचबरोबर सौरव आयरे, सुरेश सावंत, विलासजी कांबळे, पॅंथर युवक नेते प्रितम आयरे महिला मंडळाच्या तालुकाध्यक्ष श्रीमती ऋतुजा आंबुलकर यांनी दिले.
बुद्ध धम्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध यांना बुद्धगया बिहार या ठिकाणी दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. याच ठिकाणी अखंड मानव जातीची अस्मिता व श्रद्धा असलेले महाबोधी बुद्ध विहार आहे. परंतु बोधगया टेम्पल कायदा १९४९ प्रमाणे सदर विहारावर अबौद्ध व्यक्तींचा ट्रस्टमध्ये समावेश करण्यात आल्याने त्यांच्याकडून कब्जा करून त्यांच्याद्वारे बौद्ध इतिहास, बौद्ध संस्कृती, परंपरा यांची हानी केली जात आहे. सदरचा बोधगया टेम्पलचा १९४९ चा हा बिहार सरकारने संमत केलेला कायदा असून तो बिहार विधिमंडळाने रद्द करावा. देशातील इतर धर्मियांची प्रार्थना स्थळे ही ज्यांच्या त्यांच्या धर्मियांच्या पूर्ण व्यवस्थापनाखाली आहेत. त्याप्रमाणे बोधगया टेम्पल कायदा रद्द करण्यात येऊन सदर महाबोधी बुद्ध विहार पूर्णपणे बौद्ध धर्मीयांच्या व्यवस्थापनात मिळावे यासाठी बिहार विधिमंडळाने तातडीने कार्यवाही करावी व जगातील तमाम बौद्ध धर्मीयांना न्याय मिळवून द्यावा अशी आग्रही मागणी रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
सदरचे निवेदन माननीय राष्ट्रपती भारत सरकार, महाराष्ट्र राज्य, बिहार राज्य सरकार, राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.