(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील राज्यभर गाजत असलेल्या SBM शौचालय घोटाळ्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. वाटद मिरवणे ग्रामपंचायतमधील शौचालय घोटाळ्याची मोठी अपडेट समोर आली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २७ लाख ८० हजार वितरण २४४ लाभार्थीना करण्यासाठी देण्यात आले होते. यामध्ये झालेल्या भ्रष्टाचारांमधील ४,७७,४००/- रुपये इतकी तफावत आढळलेली रक्कम आहे. तत्कालीन ग्रामसेवक श्री जयकिशन आडे (सध्या कार्यरत पंचायत समिती कारंजा जिल्हा वाशिम ) यांनी शासकीय निधीचा स्वतःच्या फायद्यासाठी दुरुपयोग केल्याने त्यांच्याकडून वसुल केली आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २७ लाख ८० हजार वितरण करण्यासाठी ग्रामपंचायतला देण्यात आले होते. मात्र त्यातील भ्रष्टाचार चौकशी दरम्यान तफावत आढळलेली रक्कम ४,७७,४००/- तत्कालीन ग्रामसेवक श्री जयकिशन आडे यांच्याकडून वसूली करण्यात येत आहे. या प्रकरणात पंचायत समिती रत्नागिरीच्या गटविकास अधिकारी यांनी वारंवार याबाबत खुलासा करण्यासाठी तत्कालीन ग्रामसेवक यांना पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर तत्कालीन ग्रामसेवकांनी दिलेला खुलासा नामंजूर करून सप्टेंबर २०२४ पासून २५ हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे ग्रामसेवकाच्या पगारातून शासकीय निधीचा स्वतःच्या फायद्यासाठी दुरुपयोग केल्याने वसुली करण्यात येत आहे. यातील ४ लाख ७७ हजार ४०० रुपये ग्रामपंचायतीच्या बचत खात्यात १९ महिन्यामध्ये जमा करण्यात येतील. या ग्रामपंचायतीमधील घोटाळाबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार श्री निलेश रहाटे यांनी यासंदर्भात जून २०२३ ला स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालय योजनेची तक्रार केली होती.
दरम्यान शासन दरबारी पाठपुरावा करूनही ग्रामसेवकांकडून वसुली ही १६ महिन्यानी करण्यात येत आहे. परंतु ह्या तक्रारीच्या अनुषंगाने शौचालय घोटाळ्यामध्ये शासकीय दस्तावेजामध्ये फेरफार व खाडाखोड केलेली बिल आढळून आली होती. शासकीय दस्तऐवजामध्ये फेरफार करणे व खाडाखोड करणे हा गुन्हा असून शासकीय परिपत्रकानुसार फौंजदारीं गुन्हा दाखल होणे क्रमप्राप्त आहे. मात्र या प्रकरणात ३२ महिने तक्रारदारांनी पाठपुरावा करून सुद्धा परिपत्रकानुसार योग्य अशी कारवाई होत नसल्याचे चित्र दिसत आहे. तसेच इतर संबधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास रत्नागिरी पंचायत समिती व जिल्हा परिषद रत्नागिरी मधील तत्कालीन सीईओ कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत होते. मात्र आता नव्याने पदभार स्वीकारलेल्या सीईओ वैदही रानडे यांनी या भ्रष्ट्राचार प्रकरणात जातीने लक्ष घालून न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तत्कालीन सरपंचावर व संबंधित दोषी अधिकारी यांचेवर कारवाई का नाही?
या घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवकावर वसुलीची कारवाई करण्यात येत असली तरी मात्र तत्कालीन सरपंचावर कोणतीही वसुलीची कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणात सरपंच व संबंधित पंचायत समितीमधील दोषी अधिकारीना वाचविण्याचा प्रयत्न होत आहे का? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.