(रत्नागिरी)
राज्यातील गुईलिन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) विषाणूचा तसेच अन्य साथीच्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. तसेच ग्रामपंचायत स्तरावर पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची, वितरण बिंदूच्या पाणी नमुन्यांची प्रत्येक महिन्यातून एकदा जैविक व रासायनिक तपासणी करावी, अशीही सूचना केली आहे.
जीबीएस विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शुद्ध पाणीपुरवठा होण्याच्या अनुषंगाने गावपातळीवर नळ पाणीपुरवठा विविध जलस्रोतांतील पाण्याच्या जैविक तपासणीसाठी आवश्यक पाणी नमुने अभियान स्वरुपामध्ये गोळा करून नजीकच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेमध्ये जमा करावे, जीबीएसचा व अन्य साथरोगचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयोगशाळेत जैविक तपासणी करण्यास प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचनाही पुजार यांनी केली आहे.
पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाद्वारे गावांतील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची व घरगुती नळ कनेक्शनदारे परवठा करण्यात येणाऱ्या पाण्याची (किमान दोन नमुने) रासायनिक तपासणी वर्षातून एकदा व जैविक तपासणी वर्षातून दोनदा प्रयोगशाळेत करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
जीबीएस व अन्य साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाणीपुरवठा, स्वच्छता विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग व पंचायत समिती या विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.
पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम
लिटर प्रतिदिन प्रतिव्यक्ती विहित गुणवत्तेचा पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला घरगुती व सार्वजनिक स्रोत, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्र, उपकेंद्र इत्यादी सातत्यापूर्वक, गुणवत्तापूर्वक शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट निश्चित करावे. ग्रामीण जनतेला गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम ग्रामीण भागात गावागावांत राबविण्यात यावे, अशा सूचना पूजार यांनी दिल्या आहेत.