(संगमेश्वर / एजाज पटेल)
चहा म्हटले की कप आलाच. पण, घरातून बाहेर कामाच्या ठिकाणी गेले की, चहा म्हटले की कागदी कप हमखास नजरेला पडतो. जिल्ह्यातील अनेक सरकारी कार्यालयातही दिवसातून अनेकवेळा चहा मागविला जातो. थंडीच्या दिवसात तर चहा घेण्याचे प्रमाणही वाढते. कागदाच्या कपात चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. पण, कागदी कपावर असलेली बंदी कागदावरच राहिली आहे.
जिल्ह्यातील अनेक टपऱ्यांवर चहा पिणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. प्रशासनाने कागदी प्लास्टिकच्या कपावर बंदी असल्याचे परिपत्रक काढले. पण, त्याची अंमलबजावणी पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसून येत नाही. अगदी शहरापासून गावापातळीवर असणाऱ्या चहाच्या टपऱ्यावर आजही ग्राहकांना कागदी कपातूनच चहा दिला दिला जात असल्याने शासनाच्या कागदी कप वापरास असलेल्या बंदिस धुडकावले जात आहे असे म्हटल्यास वावगे तर ठरू नये.
जिल्ह्यात अगदी शहरासह गावच्या ठिकाणी कित्येक पटीने छोटी-मोठी चहाची हॉटेल आणि टपऱ्या आहेत. या टपऱ्यांमधून कागदी कप हा चहासाठी सर्रास वापरला जातो. यूज अँड थ्रो असलेले हे प्लास्टिक आणि कागदी कप वापरासाठी सोपे असले आणि त्यामुळे आपली मेहनत कमी होत असली तरी देखील हेच कप आपल्या आरोग्यासाठी खूपच घातक आहेत. कागदी कप या संदर्भात पर्यावरण संवर्धन करणाऱ्या संस्था, संघटना आणि समितीकडून प्रशासनाकडे मागील अनेक महिन्यांपासून बंदीचा पाठपुरावा करत आहेत.
पेपर कप तयार करण्यासाठी हायड्रोफोबिक फिल्मचा एक थर त्यात बसविला जातो. हा थर प्रामुख्याने प्लास्टिकचा बनलेला असतो. त्याच्या मदतीने, कपमधील द्रव टिकून राहते. मात्र गरम पाणी घालल्यानंतर १५ मिनिटांत हा थर वितळण्यास सुरुवात होते. रिसर्चनुसार, ‘एका कपात फक्त १५ मिनिटांसाठी १०० मिली गरम द्रव पदार्थ (८५-९० ओसी) ठेवल्यास त्यात २५,००० मायक्रॉन आकाराचे (१० मायक्रोन ते १००० मायक्रोन) प्लास्टिकचे सूक्ष्म कण विरघळतात’ आयआयटी खड़गपूर च्या संशोधकांनी केलेल्या रिसर्चमधून ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. जर एखादी व्यक्ती दिवसातून तीन वेळा पेपर कपमधून चहा पीत असेल, तर त्याच्या शरीरात प्लास्टिकचे ७५,००० सूक्ष्म कण जातात असं रिसर्चमध्ये म्हटलं आहे.
या चहाच्या कागदी कपांवरील बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. जेणेकरून सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक संस्था, दुकाने, समारंभ या ठिकाणी या कागदी कप वापराचा जो अतिरेक सुरू आहे, तो बंद व्हावा. तर प्लॅस्टिक पिशव्या, कटलरी, स्ट्रॉ, फूड पॅकेजिंग आणि डिस्पोजेबल पाण्याच्या बाटल्या यासारखी उत्पादने १ जुलै २०२२ पासून सरकारने बेकायदेशीर ठरवली आहेत.
दुर्धर आजार होण्याचा धोका
प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकात कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिक वितळते आणि तो चहा घेतल्याने लाखो मायक्रो प्लास्टिकचे कण पोटात जातात. आजकाल सर्व चहाचे कॅन्टीन, हॉटेल व छोट्या मोठ्या समारंभात सर्रास वापरले जाणारे कागदी कप हे मानवी शरीरासाठी घातक आहेत. ज्यामुळे हजारो नागरिकांना कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागण्याचा धोका आहे. त्यामुळे चहाच्या कागदी कप वापरावर बंदी घालण्याच्या सूचना परत एकदा सर्व संबंधित विभागप्रमुखांना दिल्या जाव्यात अशी मागणी होत आहे.