(देवळे / प्रकाश चाळके)
देवरुख एसटी आगाराची दिवसेंदिवस खालावत चाललेली स्थिती आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून यावेळी जनता रस्त्यावर उतरणार नाही… पण हातात पेन घेऊन ऐतिहासिक पाऊल उचलणार आहे. “एक सही हीच लोकचळवळ” या अभिनव मोहिमेद्वारे संपूर्ण संगमेश्वर तालुका एकवटला आहे.
देवरुख आगारातून मिळालेल्या सत्य माहिती नुसार सद्यस्थितीत देवरूख आगाराची दयनीय स्थिती असल्याचे उघड झाले आहे. आवश्यक बसेस ८५ आणि उपलब्ध बसेस आहेत ७१ त्यापैकी लवकरच भंगारात २२ बसेस जाणार अशी परिस्थिती असताना ३६ बसेसचा आगाराला तूटवडा आहे. यामुळे दैनंदिन सेवेचा बोजवारा उडाला आहे. ८५ बस चा कारभार ४९ बसेस ने चालवता येऊ शकत नाही, म्हणजेच आजची स्थिती ही अशी आहे की देवरूख आगार जवळपास ठप्प होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
भविष्यात अनेक मार्ग बंद होणार आहेत त्यासोबत शंभर चालक वाहकांची कमतरता, पन्नास यांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता, या सर्वांचा परिणाम फेऱ्या रद्द, बस वेळेत नाही, रस्त्यात बस बंद यामुळे जनतेला समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रक्षुब्ध झालेल्या जनतेने निग्रह करुन प्रशासनाचे लक्ष या गंभीर विषयाकडे आकर्षित करण्यासाठी “सही आंदोलन” हा नवा मार्ग अवलंबला आहे.
या आंदोलनात जनतेसोबत लोकप्रतिनिधीही मैदानात उतरले असल्याने या मोहिमेला जोरदार सुरुवात झाली आहे. अबालवृद्धांचा अभूतपूर्व वाढता पाठिंबा मिळत असून लहान मुले तरुण वयोवृद्ध महिला श्रीमंत गरीब सर्व धर्मीय लोक देवरुख आगाराला आवश्यक एसटी बसेस आणण्यासाठी कंबर कसत आहेत.
यासाठी देवरुख आगार कार्यक्षेत्रातील १ खासदार १ पालकमंत्री २ आमदार १ जि.प. उपाध्यक्ष ६ जि.प. सदस्य १ पंचायत समिती सभापती, १ पंचायत समिती उपसभापती १२ पंचायत समिती सदस्य १ नगराध्यक्ष, १ उपनगराध्यक्ष १७ नगरसेवक १९५ सरपंच शेकडो ग्रामपंचायत सदस्य यांनीही या लोकचळवळीला पाठिंबा देण्याची गरज आहे. त्यांनी आपल्या लेटर हेड वर ४० गाड्या तसेच चालक वाहक आणि यांत्रिक कर्मचारी कमतरता मागणी स्वतंत्रपणे किंवा लोक चळवळीकडे द्यावी ही विनंती करण्यात येत आहे. देवरुख आगार वाचविणे या एका उद्दिष्टाने संपूर्ण संगमेश्वर तालुका एकवटला आहे.
या मोहिमेंतर्गत जनतेला थेट आवाहन करण्यात येत आहे. तुमची एक सही हजारो लोकांचे आयुष्य बदलू शकते. या मोहिमेंतर्गत ४० नवीन बसेस तात्काळ द्याव्यात, १०० चालक- वाहक भरती, ५० यांत्रिक कर्मचारी भरती धोकादायक वर्कशॉपचे पुनर्निर्माण करणे या मागण्या करण्यात आल्या आहेत देवरुख आगार वाचवायचा असेल, तर प्रत्येक नागरिकाने पुढे येणे गरजेचे आहे. यासाठी फक्त पेन उचला आणि सही करा! आपला या आंदोलनात सहभाग नोंदवून कर्तव्य पार पाडा!
लोकप्रतिनिधीनी ४० गाड्या द्यावी असे मागणी पत्र द्यावे
स्थानिक लोक प्रतिनिधी (वैयक्तिक)/ ग्रामपंचायत/ नगर पंचायत यांचे मागणीचे कवरिंग लेटर तसेच नागरिकांची सही साठी खालील ठिकाणी सम्पर्क करावा तेथे सही करीता अहवाल आणि मागणी पत्र ठेवण्यात येणार आहे. संगमेश्वरवासियांनी या पत्रावर सह्या करुन देवरुख आगार वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन सुरेंद्र उर्फ भाऊ शिंदे लोकचळवळ – संयोजक, संतोष लाड – माजी सभापती संगमेश्वर, ॲड पूनम चव्हाण – वकील तथा सामाजिक कार्यकर्त्या, निखिल कोळवणकर – साईनाथ कोल्ड्रिंक्स हाऊस देवरुख यांनी केले आहे.

