( संगमेश्वर / प्रतिनिधी )
माखजन, आरवली, कासे, करजुवे मार्गावर अनधिकृतरित्या उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे बिनाबोभाट सुरू आहे. त्या विरोधात आज सर्वपक्षीयांच्या वतीने रास्ता आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे. याबरोबरच अवैध वाळू व्यवसाय करणारे व्यावसायिक आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते परशुराम पवार यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले आहे. माखजन आणि आरवली पांचक्रोशीतील ग्रामस्थ बावा जड्यार, दत्ता परकर, सुशिल भायजे, अनंत गुरव, गणपत चव्हाण, शैलेस धामणसकर, पदाधिकारी, कार्यकर्ते आता रास्ता रोको आंदोलनात सहभागी होणार आहेत.
वाळूचोरी रोखण्यासाठी महसूल मंत्र्यांनी नुकतीच कठोर कारवाईची घोषणा केली आहे. वाळू माफियांच्या वाहनांवर कारवाईसाठी महसूल प्रशासनासह आरटीओ, पोलीस प्रशासनाला देखील विशेष अधिकार देण्यात आले आहेत. माखजन करजुवे भागातून एका रात्रीत वेळी किमान १०० ब्रास वाळूची खुलेआम विविध वाहनांच्या माध्यमातून वाहतूक सुरू असताना स्थानिक महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे.
यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनीच याकड़े लक्ष घालून वाळू वाहतूकदारांवर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात आहे. आठवडाभरापूर्वी जयगड, गडनदी खाडी पत्रातून सक्शन पंपापाच्या सहाय्याने दिवसढवळ्या बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर अवजड वाहनानी वाळू वाहतूक करण्यात येत होती. याविरुद्ध ओरड सुरु झाल्यावर आता वाळू माफियांनी आपला पवित्रा बदलून काळोख पडल्यावर आपले धंदे सुरु केले आहेत.
दिवसा विविध अवजड वाहनातून वाळू वाहतूक करण्यात येते. यासाठी शासनाच्या तिजोरीत एक पैसाही भरणा करण्यात येत नाही, ही वस्तुस्थिती असताना प्रशासनाचा याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. आता वाळू चोरांनी संध्याकाळी वाळू उपसा करण्याचे धोरण अवलंबले आहे. संध्याकाळी ५० पेक्षा जास्त अवजड वाहनातून वाळू चोरी करून वाहतूक करण्यात येत आहे. नेहमी तत्पर असणाऱ्या पोलीस यंत्रणेचा याकडे दुर्लक्ष का ? असा सवाल विचारला जात आहे.
संगमेश्वर तालुक्यात, माखजन भागात अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, त्यावर काही केल्या नियंत्रण मिळेनासे झाले आहे. वाळू गटांचे लिलाव झालेले नसताना खाडी, नदीपात्रांमधून सर्रास वाळू उपसा सुरू आहे. यंत्रणाही वाळूमाफियांसमोर हतबल झाल्या आहेत. लाखो ब्रास वाळू उपसा करून ती वायुवेगाने फिरणाऱ्या डंपरद्वारे पोचविली जात आहे. एकीकडे या अवैध उपशामुळे नदीपात्रांची हानी होऊन पर्यावरण धोक्यात येत आहे, तर दुसरीकडे बेभान वाहतुकीमुळे अपघात होऊन जीवितहानीही होण्याची भीती निर्माण झाली आहे.