(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यात रायपाटण–पाचल मार्गावरील हरळ परिसरात आज शनिवारी (दि. ४ जुलै) झालेल्या भीषण रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत दुचाकीस्वाराचे नाव नितेश चिमाजी साळवी असे असून, ते एमएच ०३ एक्स ६९७३ क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत होते. त्यावेळी एमएच ४६ सीयू २११६ क्रमांकाच्या मच्छी वाहतूक करणाऱ्या पिकअप टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत साळवी गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच रायपाटण येथील विनायक लिंगायत यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी स्वतःचे वाहन थांबवून गाडीतील चादरीच्या साहाय्याने जखमीला सुरक्षितपणे उचलले. पोलिसांना घटनेची माहिती देत कोणतीही वेळ न दवडता त्यांनी जखमीला स्वतःच्या वाहनातून रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत पोलिसांना याबाबत काहीच कल्पना नव्हती, ग्रामीण रुग्णालय रायपाटण यांच्याकडून कळवले तरी पोलीस घटनास्थळी आणि हॉस्पिटलला पोहचलेले नव्हते.
जखमीची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय (सिव्हिल) रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचार सुरू असतानाच नितेश साळवी यांची प्राणज्योत मालवली. या बचावकार्यात संतोष गांगण, सुभाष शेटे, महादेव शिंदे आणि दामाजी पांचाळ यांनीही मोलाचे सहकार्य केले.
पोलिसांनी नोंदविलेल्या जबाबानुसार, बोलेरो पिकअप चालक प्रदीप कमलेश कनेजिया (वय २२, रा. गंगीपूर बेराडी, ता. निजामाबाद, जि. आझमगड, उत्तर प्रदेश) याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला धडक दिल्याचा आरोप आहे.
दरम्यान, या अपघाताप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, अपघाताचे नेमके कारण, चालकाची जबाबदारी आणि इतर बाबींचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत. नितेश साळवी यांच्या अकाली निधनामुळे रायपाटण–पाचल परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात संबंधित चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून आणणे व मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.

