(लांजा)
लांजा शहरातील साई समर्थ रेसिडन्सी येथील ४२ वर्षीय वैभव चंद्रकांत चोरगे हे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव चंद्रकांत चोरगे (वय ४२, रा. साई समर्थ रेसिडन्सी, एफ विंग, रूम नं. १०३, लांजा, जि. रत्नागिरी) हे गुरुवार, दि. १४ मे रोजी “रत्नागिरी एसपी कार्यालयात बोलावले आहे, तेथे जात आहे,” असे कुटुंबीयांना सांगून दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते.
यावेळी त्यांनी आपल्या मालकीची पांढऱ्या रंगाची नॅनो कार (एमएच ०४ एफझेड ०३३०) सोबत घेतली होती. मात्र, त्यानंतर ते परत घरी आले नाहीत. नातेवाईक आणि परिसरात सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. अखेर पत्नी अस्मिता वैभव चोरगे (वय ४१) यांनी लांजा पोलिस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
अशी आहे वैभव चोरगे यांची ओळख
बेपत्ता वैभव चोरगे यांची उंची अंदाजे ५ फूट ८ इंच असून रंग सावळा, चेहरा उभट, केस काळे आणि नाक सरळ आहे. त्यांनी अंगात फुल शर्ट, फुल पँट, पायात ब्राऊन रंगाची सँडल, हातात घड्याळ आणि गळ्यात चांदीची चैन घातली होती.
याप्रकरणी पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल विकास पवार अधिक तपास करत आहेत. संबंधित व्यक्तीबाबत कोणाला माहिती मिळाल्यास तात्काळ लांजा पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

